Akola News : यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत झालेल्या कमी पावसाने पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. जून व जुलैमध्ये पावसाने अपेक्षित प्रमाण न गाठल्यामुळे खरीप हंगामावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये पावसाचा फटका अधिक जाणवत आहे.
यंदा जूनमध्ये पेरणी झाली होती. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी सोयाबीनचे पीक ४५ ते ५० दिवसांचे झालेले असून फुलोरावस्थेत येत आहे. पाण्याच्या ताणामुळे पीक परिपक्व होण्याआधीच काही ठिकाणी फुलोरावस्था आली आहे. याचा परिणाम थेट उत्पादनावर होतो असे शेतकरी सांगत आहेत. प्रामुख्याने कमी दिवसांत येणाऱ्या मूग, उडीद या पिकांसह सोयाबीनला अधिक झळ बसू शकते.
या तीनही जिल्ह्यांत खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. सर्वच पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. अशा काळात पावसाचा खंड नुकसानकारक बनू शकतो. पावसातील अनियमिततेमुळे काही ठिकाणी कीड-रोगांचे प्रमाण वाढू शकते. हे सर्व प्रकार उत्पादन घटीसाठी कारणीभूत राहू शकतात. कमी पावसामुळे बहुतांश प्रकल्पातील पाणीसाठे आधीच कमीच आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील १३ पैकी ९ तालुक्यांत सरासरीच्या खाली पावसाची नोंद झाली आहे. संग्रामपूर तालुक्यात सर्वात कमी म्हणजेच केवळ ६१ टक्के पाऊस झाला आहे. इतर तालुक्यांमध्ये जळगाव जामोद (८६.७%), खामगाव (८०.२%), शेगाव (७८.२%), मोताळा (७५.९%) व नांदुरा (६८.२%) अशा प्रमाणात पावसाने उणेच भरलेली आहे. परिणामी, या भागातील पेरण्या आटोपल्या तरी आता पीक वाढीच्या अवस्थेत परिणाम दिसून येत आहेत.
वाशीम जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. मात्र, कारंजा तालुक्यात सरासरी ४०६.६ मिमीच्या तुलनेत केवळ ३३७.४ मिमी (८३%) पाऊस झाला आहे. मानोरा (९१.२%) व वाशीम (९६.६%) येथे सरासरीच्या थोड्याशा खाली पाऊस झाला आहे. मात्र, रिसोड (११८.४%), मालेगाव (१२८.७%) व मंगरूळपीर (१०६.४%) येथे सरासरीच्या वर पावसाची नोंद झाली आहे.
अकोल्यातील पाच तालुके सरासरीच्या आत
अकोला जिल्ह्यातील सात पैकी पाच तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली आहे. अकोला तालुक्यात जून-जुलै महिन्यांत केवळ २६२ मिमी पावसाची नोंद झाली असून, ही सरासरी ३५६ मिमीच्या केवळ ७३.६ टक्के आहे. मूर्तिजापूर (७७.५%), बार्शीटाकळी (९४.१%), अकोट (९९.७%) व तेल्हारा (९०.९%) येथेही पाऊस अपेक्षेपेक्षा कमीच झाला आहे.-विलास वाशीमकर, तालुका कृषी अधिकारी, अकोला
ज्या शेतकऱ्यांना शक्य असेल त्यांनी पिकात कोळपणी करणे फायदेशीर राहू शकेल. निंदण करून घ्यावे यामुळे जमीन भुसभुशीत होईल व जमिनीत मुरलेले पाणी पिकांच्या मुळांना मिळेल. आंतर मशागतीला महत्त्व आहे. उघाड असल्याने या काळात कीडरोग नियंत्रण करण्यास प्राधान्य द्यावे. येत्या काही दिवसात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे परिस्थिती सुधारू शकेल.- डॉ. प्रकाश घाटोळ, विस्तार कृषी विद्यावेत्ता, पंदेकृवि अकोला
मी २५ जूनला ८ एकरांत सोयाबीन-तूर लागवड केली आहे. आमच्याकडे जवळपास १५ दिवसांपासून पाऊस नाही. सोयाबीन फुलोऱ्यात आले होते. पण जमिनीत ओलावा नसल्याने आता दिवसा सुकत आहे. फुलोर गळाला. यामुळे येत्या काळात पाऊस आला तरी उत्पादनाला मोठी झळ बसणार हे निश्चित आहे.- अविनाश ज्ञानेश्वर साबळे, कानशिवणी, ता. जि. अकोला
सोयाबीन फुलोरावस्थेत आहे. पावसाअभावी सोयाबीन, कपाशी या पिकांची वाढ खुटलेली दिसते. ज्यांच्याकडे सोय आहे त्यांनी सिंचन करावे.-विलास वाशीमकर, तालुका कृषी अधिकारी, अकोला
वीस एकरांवर सोयाबीन- तूर पेरणी केलेली आहे. आधीच पाऊस उशिरा झाल्याने पेरणीही उशिरा झाली. सध्या सोयाबीन फुलोऱ्यात असताना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. दोन दिवसांत पाऊस न आल्यास पीक उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटेल.- ज्ञानेश्वर वाघोडे, शेतकरी सागंवी, ता. तेल्हारा, जि. अकोला
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.