Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : पीककर्ज वाटपात ‘डीसीसी’सोबत स्टेट बँकेचेही आघाडी

Team Agrowon

Latur News : जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसोबत यंदा भारतीय स्टेट बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकांनी पीक कर्जासाठी चांगलाच पुढाकार घेतल्यामुळे खरीप हंगामाचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ९९ टक्क्याच्या पुढे गेले आहे. अर्थात हे उद्दिष्ट तडीस जाण्यासाठी जिल्हा बँकेने मोठा हातभार लावला असून बँकेने उद्दिष्टाच्या १६४ टक्के कर्ज वाटप केल्यामुळे उद्दिष्टाच्या कमी वाटप केलेल्या बँकांचे गंगेत घोडे न्हाऊन निघाले आहे.

भारतीय स्टेट बँकेने यंदा ९६ टक्क्याच्या पुढे वाटप करून पीक कर्जात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात मिळून यावर्षी तीन हजार कोटीच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यात खरीप हंगामासाठी दोन हजार चारशे तर रब्बी हंगामात सहाशे कोटीचे कर्ज वाटप करण्याचे नियोजन आहे.

त्यासाठी प्रत्येक बँकांना उद्दिष्ट देण्यात आले असून या उद्दिष्टानुसार यंदाही जिल्हा बँकेने कर्ज वाटपात मोठी आघाडी घेतली आहे. बँकेने पाच लाखांपर्यंतच्या पीक कर्जासाठी बिनव्याजी कर्ज योजना राबवून यंदाही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे. यातूनच ८५३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना बँकेने एक हजार ४०२ कोटीचे वाटप करून जिल्ह्याचे एकूण कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वाढवण्यासाठी मोठा हातभार लावला आहे.

यामुळे अनेक बँकांनी त्यांना दिलेल्या उद्दिष्टानुसार वाटप न करता त्यांच्याकडील वाटपाचा आग्रह कमी झाला आहे. जिल्ह्याचे उद्दिष्ट शंभर टक्के होत असल्याने असल्याने उद्दिष्टाच्या कमी प्रमाणात वाटप केलेल्या बँकांना सुटकेचा निःश्वास सोडल्याचे चित्र आहे. दरम्यान यंदा पहिल्यांदाच अग्रणी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने उद्दिष्टाच्या ९६ टक्के वाटप केले आहे.

बँकेला ५२३ कोटीचे उद्दिष्ट असताना पाचशे कोटीचे वाटप करून जिल्ह्यात पहिल्यांदाच ऐतिहासिक कामगिरी केली आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २५६ कोटीचे उद्दिष्ट असताना २६१ कोटीचे (१०२ टक्के) वाटप केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख ३७ हजार ९२७ शेतकऱ्यांना एकूण दोन हजार ३७२ कोटी ४६ लाखाचे पीक कर्ज वाटप झाले आहे.

लातुरातही कोटक, इंडसईंड शून्यावरच

धाराशिव जिल्ह्याप्रमाणे लातुरातही कोटक महिंद्रा बँक व इंडसईंड बँकांचे पीक कर्ज वाटप शून्य टक्के आहे. डीसीबी, एयु, इक्वीटाज बँकांनीही एक रूपयाचे वाटप केले नाही. आयडीबीआय व युको बँकेने केवळ दोन टक्के, पंजाब नॅशनल बँकेने सहा, बँक ऑफ इंडियाने नऊ, कॅनरा व सेंट्रल बँकेने प्रत्येकी ११, इंडियन बँकेने २०, एचडीएफसीने २३ तर युनियन बँकेने २४ टक्के कर्ज वाटप केले आहे. बडोदा बँकेने ४१, बँक ऑफ महाराष्ट्रने ४४, आयसीआयसीआयने ५१, अॅक्सीस बँकेने ६१ तर इंडियन ओव्हरसीज बँकेने उद्दिष्टाच्या ७५ टक्के कर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रमोद शिंदे यांनी दिली.

जिल्ह्यात प्रमुख बँकांनी यंदा पीक कर्जाचे चांगले वाटप केले आहे. जिल्हा बँकेने उद्दिष्टाच्या दीडपटीहून जास्त वाटप केल्यामुळे जिल्ह्याचे एकूण उद्दिष्ट शंभर टक्क्यापर्यंत गेले आहे. अग्रणी (लीड) बँक म्हणून भारतीय स्टेट बँकेने यंदा पीक कर्ज वाटपाचे प्रभावी नियोजन केले. शेतकऱ्यांच्या सवडीनुसार त्यांच्या सोयीच्या वेळेत गावात जाऊन त्यांना पीक कर्जाचे नूतनीकरण तसेच नवीन कर्ज वाटपाच्या सुविधा दिल्या. त्याचा परिणाम बँकेने यंदा खरीप हंगामातील कर्ज वाटपात ९६ टक्क्याच्या पुढे वाटप करून दमदार कामगिरी केली आहे.
- प्रमोद शिंदे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, लातूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goshala Anudan : गोशाळांच्या अनुदानाला राज्य सरकारची मान्यता; अनुदान बँक खात्यावर जमा होणार

Crop Damage : धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीची एक लाख हेक्टरला बाधा

Devna Water Project : जलसंजीवनीसाठी ममदापूर, देवना प्रकल्प महत्त्वपूर्ण

Agriculture Science Center : कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा

Farmer Issue : "शेतकरी अडचणीत आला तरी मोदी त्यावर एक शब्द बोलत नाही" - नाना पटोले

SCROLL FOR NEXT