Cotton Picking  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Picking Wages : कापूस वेचणी आणखी महागली

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : कापूस पीक कमी दर, अळी व किडींची समस्या यामुळे आतबट्ट्याचे ठरत आहे. अशात कापूस वेचणीची मजुरी महिन्यागणिक खानदेशात वाढली असून, शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

कापसाचे दर यंदा हवे तसे नाहीत. खानदेशात कापूस पीक प्रमुख आहे. परंतु या पिकात तोटा येत असल्याने शेतकरी अडचणीत आहेत.

कोरडवाहू कापूस पिकाची लागवड खानदेशात सुमारे सात लाख हेक्टरवर झाली होती. पिकाची स्थिती कमी पावसाने जळगावातील चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, भडगाव, बोदवड, जामनेर, जळगाव, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, धुळे व साक्रीसह नंदुरबारातील नंदुरबार,नवापूर, शहादा, अक्कलकुवा भागांत बिकट बनली होती.

हलक्या, मुरमाड जमिनीत पिकाचा फुपाटाच जणू झाला. यात काही शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये नजीकच्या शेतकऱ्याकडून किंवा इतर भागातून पाणी पैसे देऊन घेतले. पिकाचे सिंचन करून ते जगविले. त्याची स्थिती सुधारली. कोरडवाहू पिका या महिन्यात वेचणीचे काम सुरू झाले. दिवाळीच्या काळात वेचणीचे काम बंद होते. त्यानंतरही मजूरटंचाई होती. या महिन्यात वेचणी बऱ्यापैकी सुरू असतानाच मजुरी दर सतत वाढले आहेत.

पिकात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव झाल्याने बोंडे व्यवस्थित उमलत नाहीत. ती काढताना मजूर नकार देतात व मजुरी अधिक मागतात. ऑक्टोबरमध्ये कापूस वेचणीचा दर सहा रुपये प्रतिकिलो, असा होता. नोव्हेंबरमध्ये हा दर आठ ते नऊ रुपये प्रतिकिलो, असा झाला. या महिन्यात दर १२, १३ रुपये प्रतिकिलोवरून २० रुपये प्रतिकिलो, एवढा झाला आहे. अनेक मजूर किलोनुसार कापूस वेचणी करण्याचे काम नाकारतात.

प्रतिरोज यानुसार मजुरीची मागणी केली जात आहे. त्यामुळे १८० ते २०० रुपये रोज, अशी मजुरी सकाळी आठ ते दुपारी अडीच या दरम्यान कामासंबंधी द्यावी लागत आहे. एक मजूर सध्या आठ ते १० किलो कापसाची वेचणीदेखील करीत नसल्याची स्थिती आहे.

यामुळे पिकाचा उत्पादन खर्च सतत वाढत आहे. परंतु अधिकचे दिवस वेचणी न केल्यास बोंडांचे उंदीर, खारूताई नुकसान करतात. तसेच त्याचा दर्जाही घसरतो. यामुळे शेतकरी ही कार्यवाही आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने करून घेत आहेत.

कोरडवाहू क्षेत्रात एकरी ८० किलो ते एक क्विंटल उत्पादनदेखील हाती येत नसल्याची स्थिती आहे. त्यात महागाई व कमी दर यामुळे कापूस पीक परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे कृत्रीम जलसाठा आहे, त्यांनी कापूस पिकात वेचणी उरकून ते काढून घेतले आहे. परंतु ज्यांच्याकडे पाणी नाही, त्यांचे कापूस पीक शेतात उभे आहे. त्यात कुठलेही उत्पादन पुढे हाती येणार नाही, अशी स्थिती आहे. परंतु कुठलाही पर्याय नसल्याने शेतकरी पीक काढू शकत नाहीत, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

कापूस वेचणीची मजुरी वाढत आहे. ती आता परवडेनासी झाली असून, शेतीतील ३० टक्के गुंतवणूक मजुरी खर्चात करावी लागत आहे. खते, बियाणे, आंतरमशागतीचा खर्च व मजुरी खर्च यात ८० टक्के निधी जात आहे. शेतकऱ्यांच्या हाती २० टक्केही पैसा राहत नाही.
- मच्छूनाना पाटील, शेतकरी, रेल, ता. धरणगाव, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Retreating Monsoon : परतीचा पाऊस -हवी अधिक स्पष्टता

PDKV : ‘पंदेकृवि’चा चेहरामोहरा बदलतोय

Bribery Case : महा-ई-सेवा केंद्रचालक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

PDKV Shiwarferi : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवारफेरीला प्रारंभ

Soybean Cotton Subsidy : सोयाबीन, कापूस अनुदानासाठी ९१ लाख हेक्टर पात्र

SCROLL FOR NEXT