Cotton Rate Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Rate : कापूसदराच्या मुद्द्यावरून शेतकरी-व्यापाऱ्यांत संघर्ष

Cotton Issue : सात-बारावर नोंद नसल्याचे कारण देत त्यांचा कापूस नाकारण्यात आला. यातूनच संतापलेल्या अमोल ठाकरे यांनी वाहनातील कापसाला आग लावल्याने एकच खळबळ उडाली.

Team Agrowon

Nagpur News : कापसाचा हमीभाव ७०२० रुपये असताना दर्जा नसल्याच्या कारणाआड त्याची कमी दरात खरेदी होत आहे. त्यातच सरकारने हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा दिल्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यात शेतकरी विरुद्ध कापूस उत्पादक असा संघर्ष उभा ठाकला आहे. यातूनच वर्धा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने वाहनातील कापूस पेटवून दिला होता. राजुरा (चंद्रपूर), देवळी (वर्धा) समित्यांमध्ये देखील कापसाच्या खरेदीवरून दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

संततधार, त्यानंतर मॉन्सूनोत्तर पाऊस अशी परिस्थिती गेल्या हंगामात होती. बोंडअळीमुळे देखील कापसाची प्रत खालावली. त्यामुळे सध्या बाजारात अशा कापसाला ६००० ते ६८०० रुपयांचा दर मिळत आहे. हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.

त्यातूनच विदर्भातील अनेक खरेदी केंद्र, बाजार समित्यांमध्ये शेतकरी विरुद्ध व्यापारी असा संघर्ष अनुभवला जात आहे. रोठा (वर्धा) येथील अमोल ठाकरे हे शेतकरी आपल्याकडील छोट्या वाहनात कापूस भरून उमरी येथील सीसीआय केंद्रावर गेले होते. या वेळी सात-बारावर नोंद नसल्याचे कारण देत त्यांचा कापूस नाकारण्यात आला. यातूनच संतापलेल्या अमोल ठाकरे यांनी वाहनातील कापसाला आग लावल्याने एकच खळबळ उडाली.

यातच राज्य सरकारने वाढत्या असंतोषाच्या पार्श्‍वभूमीवर हमीभावाने कापसाची खरेदी न करणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा दिला. हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करीत देवळी (वर्धा) बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी दोन दिवस खरेदी बंद ठेवली. कापसाची प्रत नसेल तर सरसकट हमीभावाने कापसाची खरेदी कशी करणार, असा प्रश्‍न व्यापाऱ्यांचा आहे.

राजुरा (चंद्रपूर) समितीच्या हद्दीत देखील असाच प्रकार समोर आला होता. व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीवरून शेतकरी, व्यापाऱ्यांत वाद झाला. त्यानंतर एक दिवस खरेदी बंद ठेवण्यात आली.

राजुरा बाजार समितीच्या हद्दीत पाच जिनिंग व तीन थेट खरेदीदार आहेत. हमीभावापेक्षा कमी दराने कापूस घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. परंतु तसा कोणताच आदेश शासनाचा बाजार समित्यांना प्राप्त झालेला नाही. त्यातूनच वाद झाल्याने व्यापाऱ्यांनी एक दिवस खरेदी बंद ठेवली होती.
विकास देवाळकर, सभापती, बाजार समिती, राजुरा, चंद्रपूर
हमीभावाच्या मुद्द्यावर गुन्हे दाखल करण्याची घोषणा शासनाने केली. त्याच्या विरोधात व्यापाऱ्यांनी दोन दिवस खरेदी बंद ठेवली. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. देवळी बाजार समितीत इतर बाजार समित्यांच्या तुलनेत १०० ते १५० रुपये प्रती क्‍विंटल जास्त दर मिळत असल्याने रोजची आवक १० हजार क्‍विंटल आहे.
मंगेश वसू, सभापती, बाजार समिती, देवळी, वर्धा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT