Satara News : रोजगार हमी योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील अनेक अकुशल मजुरांची मजुरी अदृश्य लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोजगार हमी कक्षाकडून लाखो रुपये बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने जमा करण्यात आले आहेत. या मजुरांनी संबंधित यंत्रणेकडे तक्रार केली आहे; परंतु त्यांच्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे.
‘सकाळ’च्या हाती आलेल्या माहितीनुसार, कोरेगाव तालुक्यातील अनेक गावांतील मजुरांचे लाखो रुपये त्यांना न मिळता भलत्याच लोकांना दिले गेले असून, गेल्या सहा महिन्यांपासून हे मजूर रोजगार हमी विभागात खेटे घालत आहेत. किती लाभार्थ्यांचे पैसे अन्य खात्यांवर गेले आहेत, याविषयी अधिकाऱ्यांच्या पातळीवरच गोंधळ असल्याने या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे.
कोरेगाव तालुक्यातील नांदवळ, तारगाव, साप, वाठार किरोली, आसनगाव, फडतरवाडी आदी गावांमधील शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामे केली. त्यांचे सरकार यंत्रणेकडून नॅशनल मोबाइल मॉनिटरिंग सिस्टिमवर (एमआयएस) नोंद करण्यात आली; परंतु अकुशल मजुरांची मजुरी प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुरांच्या खात्यावर जमा न करता इतर लोकांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.
त्यामुळे मजुरीच्या प्रतीक्षेत असलेले अकुशल मजूर मागील सहा महिन्यांपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी कक्षात खेटे घालत आहेत. मात्र, सरकारी यंत्रणा विविध कारणे देत मजुरांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाचे लाखो रुपये अदृश्य लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होऊनही यंत्रणा गप्प बसत असल्याने जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचे अनेक आरोप होत असतात. गरिबांसाठीच्या या योजनेत विविध मार्गाने भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी समोर येत असतात. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने या योजनेत मोठा बदल करून मजुरांना डिजिटल हजेरी लावण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, या डिजिटल सेवेमुळे हे सर्व कामकाज पारदर्शक पद्धतीने केले जात असल्याचे आपल्याला वाटते; परंतु वास्तविकरीत्या सरकारी यंत्रणेकडून नेहमीप्रमाणे केला जाणारा गोंधळ आणि त्यातील भ्रष्टाचार काही थांबायचे नाव घेत नाही. रोजगार हमी यंत्रणेकडून फक्त एक-दोन नव्हे, तर असंख्य लोकांच्या खात्यात रोजगार हमी योजनेतून टप्प्याटप्प्याने पैसे वितरित केले जात आहेत; पण अशाप्रकारे किती लोकांना लाभ पोचत आहे, याबाबत यंत्रणेकडेच आकडेवारी उपलब्ध नाही. या प्रकारामुळे अनेक मजूर मागील सहा महिन्यांपासून मजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
अशी आहे एमआयएस
देशातील ग्रामीण भागातील लोकांना रोजगार हमी देण्यासाठी मनरेगा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार अकुशल मजुरांना १०० दिवसांपर्यंत रोजगाराची हमी दिली जाते. याद्वारे लोक आपला उदरनिर्वाह करू शकतात; परंतु सरकारी यंत्रणेकडून मजुरांच्या हजेरी पुस्तकात केला जाणारा गोंधळ आणि त्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी केंद्राने मनरेगाअंतर्गत काम करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नॅशनल मोबाइल मॉनिटरिंग सिस्टिम या मोबाइल अॅपवर नोंदणी करणे बंधनकारक आहे,
तसेच सरकारने डिजिटल उपस्थिती अनिवार्य केली आहे. डिजिटल हजेरीअंतर्गत मोबाइल अॅपवर वेळ दोनदा नमूद केली जाते आणि मजुरांची छायाचित्रे जिओटॅगिंग केली जातात. योजनेचे संपूर्ण कामकाज हे संगणकीकृत असून, अकुशल मजुरांच्या आधारलिंक बँक खात्यात त्यांच्या मजुरीची रक्कम जमा होते.
महात्मा गांधी रोजगार योजनेची जिल्ह्याची स्थिती
जॉब कार्डधारक कुटुंबाची संख्या दोन लाख ९४ हजार ९५३
आधार संलग्न मजुरांची संख्या ८४ हजार ३६२
रोजगार उपलब्ध करून दिलेले मजूर ४६ हजार ९१२
मनुष्य दिवस निर्मिती (लाखात) १०.४०
सरासरी प्रतिकुटुंब रोजगार निर्मिती ३२ दिवस
पूर्ण झालेली कामे ६४२७
चालू कामे १४६४१
बोगस लाभार्थी शोधण्याची गरज
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या बहुचर्चित योजनेतून मजुरांना हप्त्याचे टप्प्याटप्प्याने वितरण केले जाते. कोरेगाव तालुक्यातील ज्या अकुशल मजुरांना मजुरी मिळत नाही. त्यांनी संबंधित यंत्रणेकडे तक्रार केली आहे; परंतु यंत्रणेकडून सोईस्कर दुर्लक्ष करत खोट्या लाभार्थ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने पैसे वितरित करण्यात आले आहेत. सातारा जिल्हा रोजगार हमी कक्षाकडून लाखो रुपये बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून रोजगार योजनेकडून नेमका कोणाला लाभ होत आहे, त्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून वसुली करण्याचे मोठे आव्हान आहे.
रोजगार हमी योजनेच्या संबंधित मजुरांची मजुरी कोणत्या बॅंक खात्यात जमा झाली, याचा बोध होत नाही. याबाबाबत आम्ही महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, नागपूर येथील आयुक्तालय कार्यालयाकडे माहिती मिळण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.- नूतन पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो), सातारा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.