Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : दक्षिण महाराष्ट्रातील ऊस हंगामाला 'ब्रेक'

Sugarcane Harvesting : शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर नियमित सुरू होणाऱ्या ऊस हंगामाला दक्षिण महाराष्ट्रात पावसाने करकचून ब्रेक लावला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर नियमित सुरू होणाऱ्या ऊस हंगामाला दक्षिण महाराष्ट्रात पावसाने करकचून ब्रेक लावला आहे. हंगाम थांबल्याने कारखान्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे.

ऊस वेळेत जाणार नसल्याने शेतकरीही अस्वस्थ आहे. कमी ऊस उत्पादन, उशिरा सुरू होणारा हंगाम आणि निसर्गाच्या फटक्याने यंदाच्या ऊस हंगामावरील शुक्लकाष्ट कायम आहे.

दक्षिण महाराष्ट्रातील यंत्राद्वारे होणारी ऊस तोडणी पूर्णपणे ठप्प झाली आहे. ऊस पट्ट्यात झालेल्या जोरदार पावसाने केवळ ४० टक्के ऊस तोडणी सुरू आहे. पावसाने पश्चिम महाराष्ट्रातील तोडणी शेड्यूल पूर्णपणे बिघडले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बहुतांश ऊस पट्ट्यात शेतात अडकलेली वाहने बाहेर काढण्याचेच प्रयत्न सुरू आहेत.

अनेक ऊस शिवारामध्ये पाणी साचल्याने मजुरांद्वारे ऊस तोडणी ही बंद पडली आहे. ज्या ऊसतळावर ऊस तोडणी कामगार थांबून आहेत, तिथेही पाणी साचल्याने सर्वात आधी ऊसतोड मजुरांची निवासाची, भोजनाची सोय करण्याचे आव्हान कारखान्यांपुढे उभे ठाकले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील ऊस हंगाम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला. केवळ चार दिवस तोडणी नियमित सुरू झाली आणि पावसाचा तडाखा बसला. गेल्या चार दिवसांपासून सलग पाऊस असल्याने ऊस तोडणी करणे हे मोठे आव्हान बनले आहे. सध्या माळरानावरील व रस्त्याकडे असणाऱ्या उसाची तोडच सुरू आहे.

अर्थात शेतातून वाहनापर्यंत ओलसर जमिनीतून उसाची वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. दररोज किमान ऊस ऊस गाळपासाठी आणणे आता कारखान्यापुढे मोठी चिंतेची बाब बनली आहे. येत्या चार दिवसांत पुन्हा पाऊस झाला तर कारखाने अक्षरशः नाममात्र सुरू ठेवावे लागतील, अशी स्थिती असल्याचे कारखाना प्रतिनिधीने सांगितले.

अनेक कारखान्यांनी यंदा मजुरांबरोबरच ऊस तोडणी यंत्राचाही अवलंब केला आहे. पण शेतात ओल असल्याने ही यंत्रेच शेतात जाऊ शकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऊस तोडणी यंत्रे जागेवरच थांबून आहेत. आणखी किमान पंधरा दिवस तरी यंत्राने ऊसतोड शक्य नसल्याचे साखर कारखानदारांच्या ऊस विभागातील सूत्रांनी सांगितले.

गाळपात कोल्हापूर, सांगलीची पिछाडी

राज्याचा हंगाम सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी झाला. ३० नोव्हेंबरअखेर राज्यात १७२ कारखाने सुरू झाले आहेत. त्यांनी १६१ लाख टन उसाचे गाळप केले. गेल्या वर्षी याच कालावधीत १८८ साखर कारखान्यांनी २२६ लाख टन उसाचे गाळप केले होते.

पुणे व सोलापूर जिल्हे हे सध्या गाळपात आघाडीवर आहेत. या विभागात ३७ लाख टनापर्यंत तोडणी झाली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्याची पिछाडी अद्याप कायम आहे. या जिल्ह्यात २२ लाख टन तोडणी झाली. पावसामुळे या दोन्ही जिल्ह्यातील गाळप येणाऱ्या पंधरा दिवसांत आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...

- दक्षिण महाराष्ट्रात यंत्रांची तोडणी थांबली

- केवळ ४० टक्के ऊस तोडणी सुरू

- मजुरांद्वारे ऊस तोडणी ही बंद

- आणखी पंधरा दिवस तरी यंत्राने ऊसतोड अशक्य

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT