Solapur News : रब्बी व खरीप हंगामासाठी देण्यात आलेले ५२०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट सर्व बँकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पूर्ण करावे. तसेच एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गुरुवारी (ता. १४) दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. या वेळी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आरबीआयचे जिल्हा अग्रणी बँक अधिकारी अक्षय गोंदेवार,
नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नितीन शेळके, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखरडे, आरसेटी संचालक दीपक वडेवाले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यस्थापक संतोष कोलते, यांच्यासह सर्व शासकीय महामंडळाचे व्यवस्थापक तसेच सर्व बँकाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, की सर्व बँकांनी पीक कर्ज व कृषी क्षेत्राला वित्त पुरवठा करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. पीक कर्जाचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढावे. या वर्षीच्या हंगामात एकाही शेतकऱ्याचा बँका पीक कर्ज देत नाहीत, यासाठी प्रशासनाकडे तक्रार येऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.
यावर्षीच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यात खरीप पिकासाठी २ हजार ८५९ कोटी २१ लाख तर रब्बी हंगामासाठी २ हजार ३४० कोटी ७९ लाख रुपये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्याचे बँकांना उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सूचित केले.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रत्येक बँकांनी व जिल्ह्यातील त्यांच्या प्रत्येक शाखेच्या दर्शनी भागात स्केल ऑफ फायनान्सचा होर्डिंग लावणे आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील एकही शेतकरी पेरणीसाठी आवश्यक पैशाची तरतूद करण्यासाठी खासगी सावकाराकडे गेला नाही पाहिजे, याची जबाबदारी बँकाची असल्याचे त्यांनी सांगितले.
पीककर्जासाठी ५२०० कोटी रुपये
प्रारंभी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखरडे यांनी जिल्ह्याचा सन २०२४-२५ चा वार्षिक पत आराखडा शंभर टक्के पूर्ण झाल्याची माहिती दिली. तसेच मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटप शंभर टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच वार्षिक वित्तपुरवठा आराखडा उद्दिष्ट २० हजार २७० कोटी ४२ लाख इतके होते, तर २१ हजार २९७ कोटी ४८ लाख इतके उद्दिष्ट पूर्तता झालेली असून, या वर्षीचा वार्षिक वित्तपुरवठा आराखडा २२ हजार ४०० कोटींचा आहे. त्यात खरीप व रब्बी पीक कर्जासाठी एकूण ५२०० कोटीची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
...तर रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील सर्व बँकांची प्रत्येक महिन्याला पीक कर्ज वाटप, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तसेच अन्य महत्त्वपूर्ण योजनांसाठी बैठका घेण्यात येतील. त्यामुळे सर्व बँकांनी त्यांना दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या बँका शासन पुरस्कृत योजनांसाठी वित्त पुरवठा करणार नाहीत, अशा बँकाबाबत रिझर्व्ह बँकेकडे तसेच राज्यस्तरीय पुनर्लोकन समितीकडे अहवाल पाठवण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.