Sindhudurg News : जूनमध्ये लांबलेला पाऊस आणि जुलैमध्ये एकाच महिन्यात झालेली अतिवृष्टी याचा मोठा फटका सुपारी पिकाला बसला आहे. मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला तालुक्यांत मोठ्या प्रमाणात सुपारी लागवड आहे. नारळ लागवडीत आंतरपीक म्हणून सुपारीची लागवड केली जाते. त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. परंतु गेली दोन-तीन वर्षे बदलत्या वातावरणाचा मोठा फटका सुपारी पिकाला बसू लागला आहे.
गेल्या वर्षी ६ जूनला जिल्ह्यात दाखल होणारा मॉन्सून तब्बल २३ जूनला सक्रिय झाला. त्यानंतर सरासरी ५० टक्के पाऊस जुलै महिन्यात पडला. या महिन्यात अतिवृष्टी झाली. त्याचा मोठा परिणाम सुपारी पिकावर झाला. मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्याने उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे सुपारी उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात सुपारीची सर्वाधिक लागवड आहे. येथील सुपारीला बांदा आणि गोवा अशा दोन बाजारपेठांत मागणी आहे. परंतु अलीकडे परिपक्व होण्याआधीच सुपारी गळून पडत असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
गळून पडलेल्या सुपारीला परिपक्व सुपारीच्या ५० टक्के देखील दर मिळत नाही. त्यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान होते. सध्या जुन्या सुपारीला प्रतिकिलो ३५० ते ३६० रुपये, नवीन सुपारीला ३१५ ते ३२० रुपये तर गळून पडलेल्या सुपारीला केवळ १६० ते १७० रुपये दर मिळत आहे.
सुपारीमध्ये होणारी फळगळ ही शेतकऱ्यांसाठी मोठी नुकसानकारक आहे. सुपारीवर फवारण्या करणे शक्य होत नाही. त्यामुळे सुपारी पीक टिकविण्यासाठी बुंध्यात वापरण्यायोग्य औषधांचे संशोधन होणे गरजेचे आहे.- शैलेश लाड, सुपारी उत्पादक, नेतर्डे, ता. सावंतवाडी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.