Onion Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : कांदा व्यापाऱ्यांच्या मनमानीचा शेतकऱ्यांना फटका

गहू, कांदा, हरभरा, द्राक्ष, भाजीपाला अशा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Nashik News : उमराणे येथील स्व. निवृत्तिकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवार (ता. १६) कांदा आवारात देवळासह मालेगाव, सटाणा व चांदवड तालुक्यांतील शेतकरी पावसाचे वातावरण असतानाही भल्या पहाटे कांदा ट्रॉलीत भरून तो झाकून लिलावासाठी दाखल झाले होते.

मात्र बाजार समिती संबंधित कुण्या व्यक्तीकडे लग्नानिमित्त मांडव कार्यक्रम असल्याने व्यापारी तिकडेच व्यस्त होते. त्यामुळे सकाळी ९ वाजता सुरू होणारे कांदा लिलाव २ तासाने उशिरा म्हणजेच ११ वाजेच्या सुमारास सुरू झाले.

परिणामी, शेतकऱ्यांना भल्या पहाटे येऊनही दोन तास ताटकळत राहावे लागले. त्यामुळे बाजार समितीत व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे समोर आले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून लेट खरीप कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे. त्यातच जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ऐन सुगीच्या दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीचे संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर घोंघावत आहे.

परिणामी, गहू, कांदा, हरभरा, द्राक्ष, भाजीपाला अशा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अंतिम टप्प्यात लेट खरीप कांद्याची काढणी करून नुकसान टाळण्यासाठी कांदा बाजारात आणून विक्री करत आहेत.

मात्र उमराणे बाजार समितीमध्ये उपाशीपोटी कांदा विक्रीसाठी आलेले शेतकरी सकाळी ९ वाजेपासून लिलाव लवकर सुरू होतील, यासाठी व्यापाऱ्यांची वाट पाहत होते. मात्र व्यापारी मांडव कार्यक्रम असल्याने वेळेवर लिलावात न येता तिकडेच सहभागी होते.

या वेळी राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्यासह जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, जिल्हा समन्वयक भगवान जाधव, कळवण तालुका प्रमुख विलास रौंदळ हे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येथे दाखल झाले असता हा प्रकार उघडकीस आला.

शेतकऱ्यांनी मांडली व्यथा...

बाजार समितीने तिसगाव रोडवरील नव्या बाजार आवारात लिलाव केले आहेत. येथे कांदा लिलाव शेड, सिमेंट काँक्रीट सुविधा येथे अद्याप नाहीत. अशातच पावसाचे सावट असताना कांदा व्यापारी वेळेवर लिलाव सुरू करत नाहीत.

त्यामुळे पावसात कांदा भिजल्यास जबाबदार कोण? पणन मंडळाच्या माहितीनुसार उमराणे बाजार समितीमध्ये लेट खरीप कांद्याचे दर लगतच्या बाजार समितीच्या तुलनेत १०० रुपयांनी कमी आहेत.

एकीकडे दरात फटका त्यातच लिलाव प्रक्रियेत मनमानी कांदा उत्पादकांसाठी अडचणीची ठरत आहे, अशी व्यथा शेतकऱ्यांनी ‘ॲग्रोवन’कडे मांडली.

दररोज ९ वाजता लिलाव चालू झाले. तर १० वाजता माल खाली होतो. त्यामुळे दुपारी घरी जाऊन शेतीकामे करता येते. मात्र आता संध्याकाळी घरी जावे लागेल. व्यापाऱ्यांचा मांडव कार्यक्रम झाला. मात्र आमचे सर्व नियोजन चुकले, वेळेवर पैसेही मिळत नाही.
प्रमोद पवार, शेतकरी, वायगाव, ता. सटाणा
कौटुंबिक कार्यक्रमाच्या आडून शेतीमालाचे लिलाव उशिरा सुरू करणे चुकीचे आहे. वेळेत लिलाव करून शेतकऱ्यांना सहकार्य अपेक्षित आहे. असे प्रकार कांदा उत्पादक खपवून घेणार नाही, राज्यांतील बाजार समित्यांनी सुद्धा असे प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे.
भारत दिघोळे, अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
बाजार समितीचे लिलाव उशिरा सुरू होतील. असे संदेश पाठवून कळविण्यात आलेले होते. त्यानुसार कामकाज झाले.
नितीन जाधव, सचिव-कृषी उत्पन्न बाजार समिती, उमराणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT