Pune News : ‘‘घोडगंगा साखर कारखाना माझ्यामुळे बंद झाल्याची हाकाटी शिरूरमध्ये उठवली जात आहे. मी घोडगंगा सुरू ठेवण्यासाठी नुकतेच ३५ कोटी रुपये दिले आहेत. तरीही मी कारखाना बंद पाडला असेल तर व्यंकटेश साखर कारखाना कसा सुरू, तो का नाही बंद पडला,’’ अशी कोपरखळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार अशोक पवार यांचा नामोल्लेख टाळत मारली. तर, अनुभव नसलेल्या मुलाला कारखाना अध्यक्ष केल्यामुळे ही दुरवस्था झाल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.
सणसवाडी (ता.शिरूर) येथील जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, मुस्लिम, आदिवासी ते सर्व समाज घटकाला आर्थिक सक्षम करण्यासाठी जी पावले आम्ही उचलली आहेत ती पुढील पाच वर्षांतही कायम ठेवणार आहोत. पुढील काही दिवसांत पुणे-नगर रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक कोंडी संपवण्यासाठी जम्बो फ्लाय ओव्हर करण्याची गॅरंटी देतो.
मी आत्तापर्यंत १० वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला असून चालू अर्थसंकल्प हा ६५ लाख कोटींचा असून, ४२ लाख कोटींपेक्षा जास्त महाराष्ट्राचे स्थूल उत्पन्न हे राज्याची आर्थिक सुस्थिती दर्शविते. त्यामुळे विरोधकांनी आता राज्याची आणि आम्ही जाहीर करत असलेल्या लोक कल्याणकारी योजनांची काळजी करू नये.’’
‘‘मी १९९१ शिरूरचा लोकसभेचा खासदार होतो, त्यामुळे शिरूर, हवेली आणि या भागातल्या सामाजिक, प्रशासकीय, संस्थात्मक विकास कामांमध्ये माझे सर्वाधिक योगदान आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक ३०० कोटी एवढ्या विक्रमी निधीमध्ये आपण उभे करत आहोत,’’ असेही ते म्हणाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.