Commissioner Raosaheb Bhagde
Commissioner Raosaheb Bhagde Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Inputs Shortage : निविष्ठांची कृत्रिम टंचाई केल्यास कारवाई होणार

Team Agrowon

Pune News : ‘‘राज्यात खरीप हंगामासाठी खते व बियाण्यांची पुरेशी उपलब्धता आहे. त्यामुळे कृत्रिम टंचाई करीत शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाल्यास कारवाई केली जाईल,’’ असा इशारा प्रभारी कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांनी दिला.

डॉ. प्रवीण गेडाम यांची कृषी आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर राज्य शासनाने अद्यापही पूर्णवेळ आयुक्त नियुक्त केलेला नाही. तात्पुरती व्यवस्था म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी श्री. भागडे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. ते महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक आहेत.

श्री. भागडे यांनी मंगळवारी (ता. ४) आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांचे स्वागत फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी केले. मृद्संधारण संचालक रवींद्र भोसले, फलोत्पादन अभियानचे प्रकल्प व्यवस्थापक सुभाष काटकर, आस्थापना सहसंचालक राजेश पाटील, आयुक्त कक्षाचे उपसंचालक कांतिलाल पवार या वेळी उपस्थित होते.

‘निविष्ठांचा पुरेसा साठा’

श्री. भागडे म्हणाले, ‘‘कृषी विभागाचे सारे प्राधान्य आता खरीप हंगाम नियोजनाला राहील. खते, बियाणे, कीटकनाशके या निविष्ठांची राज्यभर योग्य उपलब्धता आहे. निविष्ठांमध्ये सर्वांत आधी पेरण्यांसाठी बियाण्यांची मागणी होत असते. जिल्हानिहाय बियाणे व खतांचा पुरेसा साठा ठेवलेला आहे. मात्र कृत्रिम टंचाई होऊ नये यासाठी सर्व घटकांनी काळजी घ्यायला हवी.

बियाणे कंपन्यांच्या विपणन प्रचाराचा भाग किंवा स्थानिक पातळीवरील विक्रेत्यांकडून प्रोत्साहन यामुळेच विशिष्ट वाणांसाठी आग्रह धरला जातो. त्यामुळे बियाणे पुरेसे असले तरी काही भागांत अचानक विशिष्ट वाणांसाठी मागणीत वाढ होते. त्यातून टंचाईच्या समस्या तयार होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये. त्याऐवजी गुणवत्तापूर्ण बियाणे विकत घेण्यास प्राधान्य द्यावे. यामुळे विशिष्ट वाणासाठी मागणी किंवा कृत्रिम टंचाई असे मुद्दे टाळता येतात.’’

‘‘शेतकऱ्यांना निविष्ठांबाबत काहीही अडचण असल्यास अफवांवर विश्‍वास ठेवू नये. त्याऐवजी कृषी विभागाच्या स्थानिक कार्यालयांशी संपर्क करावा,’’ असे आवाहनही आयुक्तांनी केले.

‘‘राज्याच्या सोयाबीन पट्ट्यात घरचे बियाणे वापरण्याचे अभियान कृषी विभागाने राबविले होते. शेतकरी आता मोठ्या प्रमाणात घरगुती सोयाबीन बियाण्याला पसंती देत आहेत. त्यामुळे खुल्या बाजारातील सोयाबीनच्या व्यावसायिक बियाण्यांबाबत टंचाईचा मुद्दा उद्‍भवत नाही. तुरीचे बियाणेदेखील राज्यात भरपूर आहे.

अडचण फक्त कपाशीच्या बियाण्यांबाबत येते. त्यामुळे कृषी विभागाने कपाशी बियाण्यांबाबत नियोजन केले आहे. त्यानुसार १५ मेपासून राज्यभर शेतकऱ्यांना कापूस बियाणे विक्री सुरू झाली आहे. सध्या कपाशी बियाण्यांची विक्री व पुरवठा योग्य पद्धतीने सुरू आहे. तरीदेखील कुठे समस्या किंवा गडबड असल्याचे लक्षात येताच कृषी अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते. त्यानंतर अडचण तत्काळ दूर केली जात आहे,’’ असेही श्री. भागडे यांनी स्पष्ट केले.

‘पेरण्यांसाठी घाई नको’

‘‘राज्यात यंदा पुरेसा पाऊस होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलेला आहे. मॉन्सूनची वाटचाल आशादायक पद्धतीने होते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्यानंतर अपेक्षित ओल पाहून पेरा करावा. जमिनीत पुरेशी ओल असताना पेरण्या केल्यास पावसाचा अल्प खंड पडला तरी पेरा वाया जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ओलावा कमी असल्यास पेरण्यांसाठी घाई करू नये,’’ असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Session 2024 : कापूस खरेदीवरून वडेट्टीवारांनी सरकारला धरलं धारेवर

Maharashtra Sugar News : विधानसभेपूर्वी १३ सहकारी साखर कारखान्यांना दिलासा, १ हजार ८९८ कोटींचे कर्ज मंजूर

Drip Irrigation Subsidy : सांगली जिल्ह्यात ‘ठिबक’चे २० कोटींचे अनुदान रखडले

Solar Scheme : दहा अश्वशक्ति कृषीपंपधारक शेतकऱ्यांना वीजबिल माफ होणार का? फडणवीस म्हणाले...

Distribution of Seedlings, Inputs : केळी संशोधन केंद्रात रोपे, निविष्ठांचे वितरण

SCROLL FOR NEXT