Grape Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Crop Damage : राज्यात द्राक्षाचे सुमारे ९ हजार कोटींचे नुकसान

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : मागील आठवड्यातील गारपीट आणि पावसाचा फटका राज्यातील द्राक्ष पिकांना बसला आहे. पूर्व हंगामातील काढणीला आलेली द्राक्षे आणि फुलोरावस्थेतील सुमारे १ लाख ८० हजार एकरांवरील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना सुमारे ९ हजार कोटींचा आर्थिक फटका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज राज्य द्राक्ष बागायदार संघाने व्यक्त केला आहे. नुकसानग्रस्त बागांचे पंचनामे करून भरीव मदत देण्याची मागणी संघाने केली आहे.

राज्यात तीन वर्षांपूर्वी ४ लाख एकर द्राक्ष क्षेत्र होते. गेल्या तीन वर्षात ५० हजार एकरांनी क्षेत्र वाढले आहे. सध्या ४ लाख ५० हजार एकरांवर द्राक्षाचे क्षेत्र आहे. नैसर्गिक संकटातही शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा वाढविल्या. यंदाचा हंगाम पाणीटंचाईच्या संकटात सापडला. त्यामुळे उत्पादकांनी शेततळ्यांतील पाण्याचा आधार घेत फळ छाटणी सुरू केली.

सांगली आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर फळ छाटणी १५ दिवस अगोदर घेतली. दरम्यान, पाणी टंचाई असूनही बागेला पोषक वातावरण असल्याने बागा साधल्या. अनेक भागात पूर्व हंगामी फळ छाटणी केलेल्या बागांमधील द्राक्षे काढणीला आली आहेत. तर काही पट्ट्यात बागा फुरोलावस्था आणि पोंगा अवस्थेत आहेत.

नाताळ सणाला द्राक्षे बाजारपेठेत विक्रीस यावीत, यासाठी पूर्व हंगामी छाटणी घेतली जाते. या दरम्यान, अपेक्षित दरही मिळतात. मात्र, गेल्या आठवड्यात सांगली, पुणे, नाशिक आणि सोलापूर विभागात वादळी वाऱ्यासह गारपीट, पाऊस झाला. याचा फटका द्राक्ष बागांना बसला आहे.

पूर्व हंगामातील काढणीला आलेली द्राक्षे तडकू लागले आहेत. तर फुलोरावस्थेत आणि पोंगा अवस्थेतील बागांत फळ कूज, घड जिरणे अशी समस्या आहे. उत्पादन खर्च वाढला असल्याने आधीच आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच आता पावसाने द्राक्षाचे नुकसान केल्याने शेतकऱ्यांसमोरील आर्थिक प्रश्‍न गंभीर बनला आहे.

निर्यात रोडावणार

देशातून युरोपियन देशांना निर्यात होणाऱ्या द्राक्षापैकी ९८ टक्के द्राक्षे राज्यातून निर्यात होतात. २०२१ मध्ये युरोपियन देशात ७ हजार ९६४ कंटेनर द्राक्षाची निर्यात झाली होती. २०२२ मध्ये नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. त्याचा परिणाम निर्यातीवर झाला. त्यामुळे या वर्षी राज्यातून ७ हजार ८७४ कंटेनर द्राक्ष युरोपियन देशात गेली. मात्र, यंदा नुकसानीमुळे राज्यातून द्राक्षाची निर्यात घटणार असल्याचा अंदाज द्राक्ष बागायतदार संघाने व्यक्त केला आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...

- उत्पादन ४० टक्क्यांनी घटण्याची शक्यता

- एकूण क्षेत्रापैकी दोन लाख एकरांवरील द्राक्षाचे नुकसान

- युरोपियन देशात द्राक्षाची होणारी निर्यात घटणार

- गारपीट आणि वादळी वाऱ्याने बागा उध्वस्त

- डाऊनी, भुरी, करपा आणि थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव

...या आहेत समस्या

* फुलोरावस्थेत घड कुज, गळ

* पोंगा अवस्थेतील घड जिरण्याचे प्रमाण वाढले

* काढणीला आलेल्या बागेतील मणी तडकण्याची समस्या

* १५ हजार एकरांवर गारपीट झाल्याने संपूर्ण बागेचे नुकसान

विभागनिहाय द्राक्षाचे नुकसान

विभाग... नुकसान (टक्केत)

सांगली...५०

सोलापूर...४०

पुणे..३० ते ४०

नाशिक...६०

चार वर्षांपासून द्राक्ष बागांवर संकटाची मालिका सुरू आहे. त्यामुळे उत्पादक अगोदरच अडचणीत आहे. त्यात आता गारपीट आणि पावसाने राज्यात द्राक्षाचे सुमारे ९ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. भरीव मदत दिली तरच द्राक्ष उत्पादक पुन्हा उभा राहील.
- शिवाजी पवार, अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ.
एकूण सात एकरांत द्राक्ष बाग आहे. त्यामुळे सव्वा एकर आगाप फळ छाटणी केली असून दर चांगले मिळतात. सव्वा एकरातून १२ टन उत्पादन मिळाले असते. पावसाने प्रत्येक घड तडकला आहे. सात ते आठ टन द्राक्ष काढून टाकली. पावसामुळे मिळणारा पैसा पाण्यात गेला.
- महेश पाटील, खुजगाव, ता. तासगाव, जि. सांगली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT