Maharashtra Agriculture: इस्रोच्या ‘डेजर्टिफिकेशन ॲण्ड लॅण्ड डिग्रेडेशन ॲटलास ऑफ इंडिया - २०२१’नुसार देशातील ९७८ लाख हेक्टरहून अधिक जमिनीची गुणवत्ता खालावली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील १४३ लाख हेक्टर क्षेत्राचा समावेश होता. २०१८-१९ च्या अभ्यास आणि आकडेवारीतून हे स्पष्ट झाले होते. आता त्यानंतरही सात वर्षे उलटून गेली आहेत. देशातील ६० टक्के जमीन अयोग्य व्यवस्थापनाने खराब झाली असल्याचे १९४० च्या दशकात कोरडवाहू शेतीचे गाढे अभ्यासक नारायण कानिटकर यांनी सांगितले होते..अधिक दुर्दैवी बाब म्हणजे तेव्हापासून आपले शेती-मातीचे अयोग्य व्यवस्थापन चालूच आहे. त्याचेच हे सर्व परिणाम आहेत. देश असो वा राज्य बहुतांश लागवड योग्य जमीन खराब झाली आहे. राज्यात एकूण क्षेत्रफळाच्या ८० टक्के म्हणजे १७४ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे..त्यापैकी ८२ टक्के (१४३ लाख हेक्टर) क्षेत्राची गुणवत्ता ढासळली असेल, तर ही फारच गंभीर बाब म्हणावी लागेल. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे जमिनीच्या ऱ्हासाचा शेतीच्या उत्पादनावर नेमका किती परिणाम झाला, होतोय, याचे स्वतंत्र मूल्यांकन अजूनही करण्यात आले नसल्याने जमीन, माती संरक्षण, संवर्धनाबाबत आपण किती निष्क्रिय आहोत, हेही दिसून येते..Soil Moisture Conservation: जमिनीतील ओलावा संवर्धनाचे तंत्र .जमिनीची गुणवत्ता खालावत आहे म्हणजे त्यातील मातीचा अनेक कारणांनी ऱ्हास होत आहे. माती हे एक मर्यादित नैसर्गिक संसाधन आहे, जे विविध पर्यावरणीय प्रक्रियांमध्ये आवश्यक भूमिका बजावते. माती नैसर्गिकरीत्या वनस्पतींसाठी आवश्यक असलेला कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन शिवाय आवश्यक सर्व अन्न घटकदेखील पुरवते. माती पृथ्वीच्या जलचक्राचा एक महत्त्वाचा घटक आहे..माती नैसर्गिक पाणी गाळण्याची प्रक्रिया प्रणाली म्हणून काम करते, जी भूजल पुरवठा शुद्ध करते आणि पुन्हा भरते. मातीतील विविध सूक्ष्मजीव समुदाय आवश्यक पोषक तत्त्वांचे चक्रीकरण, सेंद्रिय पदार्थांचे विघटन आणि वनस्पतींना महत्त्वाचे घटक उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात..Soil Testing Technology: सेन्सर-आधारित मृदा आरोग्य परीक्षण.माती ही एक महत्त्वपूर्ण कार्बन सिंक आहे, जी वातावरणातील कार्बन डायऑक्साइड मोठ्या प्रमाणात शोषून घेण्यास सक्षम आहे. अन्न सुरक्षा, दारिद्र्य निर्मूलन आणि पर्यावरणीय शाश्वतता यासाठी मातीचे संरक्षण, संवर्धन तसेच तिची गुणवत्ता राखणे फार गरजेचे आहे..मृद् संधारणाचे जनक अमेरिकन अभ्यासक ह्यू हॅमंड बेनेट यांनी १९३९ दरम्यान संपूर्ण जगातील मातीच्या समस्येचा अभ्यास केला होता. तेव्हा त्यांनी सर्व जगाला आवर्जून सांगितले, की ज्या देशातील लोक जमिनीचे संरक्षण करण्याची तयार आहेत, त्याच देशात शेती करणे शक्य आहे. त्यांच्या सल्ल्यानंतर अमेरिकेसह इतर अनेक देशांनी जमीन, माती संवर्धन हा कायमस्वरूपी धोरणाचा एक भाग ठरवून घेतला. आपण मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असून त्याची किंमत आज मोजत आहोत..आपल्या देशात, राज्यात माती जिवंत तसेच जैवविविधताही टिकवून ठेवायची असेल तर प्रथमतः जमिनीची होणारी धूप थांबविण्याबाबतचा व्यापक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम शासनाने राबवायला हवा. या कार्यक्रमात थेट शेतकऱ्यांना सहभागी करून त्यांच्या शेतातून एकही मातीचा कण बाहेर गेला नाही पाहिजेत, असे उपचार त्यांना द्यायला हवेत. वनक्षेत्रासह इतर पडीक जमिनीतूनही माती वाहून जाऊ नये म्हणून वृक्ष लागवडीसह गवताळ कुरणांच्या विकासाची मोहीम शासनाने हाती घ्यायला हवी. .शेत जमिनीतील मातीचे प्रदूषण कमी करून पोत सुधारण्यासाठी पाणी आणि रासायनिक खते, कीडनाशकांचा प्रमाणबद्धच वापर होईल, हे पाहावे लागेल. शिवाय शेतात सेंद्रिय, जैविक, हिरवळीच्या खतांच्या वापराबाबत प्रबोधन करावे लागेल. पिकांचे अवशेष जाळून न टाकता ते शेतात कुजवून खत करण्याबाबत देखील प्रबोधन व्हायला पाहिजे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.