Nagpur News : त्या तलाव जिवंत करतात...! हे ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु हे अशक्य असलेले काम करण्याचा वसा गोंदिया जिल्ह्यातील सावित्रीच्या लेकींनी हाती घेतले आहे. तलावातील जैवविविधतेचे संवर्धन करीत त्या माध्यमातून स्थानिक माशांचे अस्तित्व राखत या महिलांनी उत्पन्नाचाही स्रोतही विकसित केला आहे.
पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा हे जिल्हे तलावाचे म्हणून ओळखले जातात. या भागात ब्रिटिशकाळातील मालगुजारी तलाव आहेत. त्याचा वापर आता ढिवर समुदायाद्वारे मासेमारीकरिता होतो. परंतु गेल्या अनेक वर्षांत या तलावातील जैवविविधतेचे संवर्धन न झाल्याने स्थानिक माशांचे अस्तित्व धोक्यात आले होते.
त्याच तलावांना पुर्नजीवित करण्याचे काम गेल्या दहा वर्षांपासून शालू कोल्हे, कविता मौजे व सरिता मेश्राम यांनी हाती घेतले आहे. तलावाला पुर्नजीवित करताना दहा वर्षांपूर्वी स्थिती कशी होती, याविषयी गावातील मासेमार तसेच वद्धांकडून जाणून घेतले जाते. त्याआधारे तलावाच्या उपचारावर भर दिला जातो.
तलावाच्या परिसरात आवश्यक त्या वनस्पतींची लागवड केल्याने माशांकरिता, जनावरांकरिता खाद्य, पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. वाघूळ, सिंगूर, पेडसी, मोलवा मुलकी अशा स्थानिक माशांचे प्रमाण वाढते. हे मासे खाण्यासाठी चवदार असल्याने त्याला मोठी मागणी आहे. निमगाव, सावरटोला, बोरटोला, जांभळी, ऐनोडी, जांभाळी गंदारी, मोरगाव अर्जुनी, गोंदिया या गावांतील महिलांचा या कार्यात सहभाग आहे.
असे होते संवर्धन...
एक बाय एक फूट आकाराचा प्लॉट तयार करतो. त्यानंतर तलाव नांगरला जातो. जैवविविधता संवर्धनासाठी ९ प्रकारच्या वनस्पतींचे बियाणे खरेदी करून त्याची पेरणी होते. जांभळी (नवेगाव बांध जवळील गाव) येथील महिलांकडून त्याची खरेदी होते.
एक हजार रुपये किलोचा दर त्याकरिता आकारला जातो. या कामाची दखल घेत राजस्थान, बेंगळुरू, मुंबई, कोकण, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर यांसह राज्यभरातील अनेक गावांमध्ये तलाव संवर्धनाबद्दल शालू कोल्हे यांना पाचारण करण्यात आले.
या वनस्पतींचा होतो वापर
तलाव व परिसरात अनेक वनस्पती असतात. त्यामध्ये तीन प्रकारच्या चिल, गाद, चिऊल, परसूड, शिवणी फूल, तीन प्रकारचे कमळ (जांभळा, लाल, पांढरा), पवन (याला फळ येतात शेंगदाण्यासारखे) यांचा समावेश आहे. याचे प्रमाण कमी असल्यास जैवविविधता संवर्धनासाठी गरजेनुसार लागवड केली जाते.
तलाव पाच वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेतो. ४३ गावांमध्ये ६३ तलाव जिवंत करण्यात यश आले आहे. बोरटोला गावात फक्त महिलांचा, सावरटोला, उमरी, जांभळी, ऐनोडी, रामपुरी, जांभळी गंदारी, सुबन बोंडगाव, खामखुरा, काटगाव, भामटेवाडा, आमगाव, दहेगाव, मुर्झापार्डी अशा गावांचा त्यामध्ये समावेश आहे. यातून स्थानिक माशांचे संवर्धन होत असल्याने आता मासेमारांना यातून २ ते ३ हजार रुपयांचे उत्पन्न होत आहे. पूर्वी बंगाली माशांकरिता मत्स्यबीज खरेदी करावे लागत होते. आता त्याची गरज भासत नाही.- शालू कोल्हे, सदस्य, तलाव संवर्धन गट
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.