Well Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Well Subsidy : तिवसा तालुक्यातील ५८४ विहिरींचे अनुदान रखडले

Agriculture Irrigation Subsidy : शेतकऱ्यांना या योजनेमार्फत चार लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. परंतु तिवसा तालुक्यात या योजनेतील सुमारे ५८४ विहिरींचे काम अपूर्ण आहे.

Team Agrowon

Amaravati News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर योजना सुरू आहे. शेतकऱ्यांना या योजनेमार्फत चार लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. परंतु तिवसा तालुक्यात या योजनेतील सुमारे ५८४ विहिरींचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे शेतात खोदून ठेवलेल्या विहिरी शेतकऱ्यांसाठी मोठे डोकेदुखी ठरत असून जनावरांचा जीव धोक्यात आला आहे.

कोरडवाहू शेती सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने शासनाने विहिरीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, या दोन महत्त्वपूर्ण योजना अमलात आणल्या. मात्र या योजनेचे खरे उद्दिष्ट हे कागदोपत्रीच झळकत असल्याने अनेक ठिकाणी विहिरींची कामे अपूर्ण असल्याचे पाहायला मिळत आहे.

तिवसा पंचायत समितीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत गेल्या पाच वर्षांत ११५२ विहिरींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यापैकी ८६१ लाभार्थ्यांनी विहिरीच्या कामांना सुरुवात केली. त्यातील २७७ विहिरी पूर्ण झाल्याची माहिती आहे.

मात्र उर्वरित ५८४ विहिरींची कामे अपूर्ण असल्यामुळे शेतातील असलेल्या अपूर्ण विहिरींमुळे जीवितहानी होण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे तालुक्यातील अपूर्ण विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी शासनाने लाभार्थ्यांशी समन्वय साधून पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

‘एमआरजीएस’मार्फत एका विहिरीच्या कामासाठी दोन वर्षांचा अवधी दिला जातो. कुशल, अकुशल कामगारांच्या माध्यमातून विहिरींची कामे केली जाते. आतापर्यंत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत २०२४-२५ यावर्षात सर्वाधिक ५१० विहिरींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ३१२ लाभार्थ्यांना विहिरी मंजूर झाल्या, परंतु एकाही लाभार्थ्याने काम न केल्यामुळे अपूर्ण विहिरींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

शेतात खोदून ठेवलेल्या अपूर्ण विहिरींमुळे दुर्घटना घडू शकते. वऱ्हा शेतशिवारातील घटना ताजी आहे. जनावरे पडून पशूंची जीवितहानी झाली तर त्याची नुकसानभरपाई कोण देणार? त्यामुळे विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
- जसबीर ठाकूर, मोझरी
विहिरींचे अनुदान वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने तालुक्यात अपूर्ण विहिरींचा आकडा मोठा आहे. शेतात खोदून ठेवलेल्या विहिरीमुळे आमच्या भावाला जीव गमवावा लागला. यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी शासनाने ठोस उपाययोजना केल्या पाहिजे.
- मंगेश भाकरे, वऱ्हा
अपूर्ण विहिरींपैकी ८६ विहिरी या २०२३-२४ पर्यंतच्या व भौतिकदृष्ट्या पूर्ण, मात्र कुशल निधीअभावी प्रलंबित होत्या. पैकी २०२३-२४ पर्यंतचा ३ कोटी ४५ लाख इतका कुशल निधी प्राप्त झाल्याने त्यांचे कार्य पूर्णत्वास नेणे सुरू आहे. उर्वरित प्रलंबित विहिरींसाठी कुशल निधीची मागणी व लाभार्थ्यांकडून पाठपुरावा सुरू आहे.
- अभिषेक कासोदे, गटविकास अधिकारी, तिवसा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Radhanagari Dam : कोल्हापुरात जोरदार पाऊस,'राधानगरी'चे चार दरवाजे उघडले

Tur Crop : खानदेशात तूर पीक जोमात

E-Peek Pahani : शेतकऱ्यांचा ई-पीक पाहणीला कमी प्रतिसाद

Banana Plantation : मृग बहर केळी लागवड ६० हजार हेक्टरवर

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील ८७९ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ५२ टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT