Akola News : जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात १३१ गावांमध्ये सुमारे १३१ कोटी ७० लाख रुपये किमतीची सुमारे १६७४ कामे मंजूर करण्यात आली आहेत. जिल्हा समितीमार्फत आतापर्यंत सुमारे सातशेवर कामांना प्रशासकीय मान्यतासुद्धा प्रदान झाल्याने ही कामे लवकरच सुरू होतील.
राज्यात ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ राबवले जाणार आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात कोट्यवधींची कामे झाली होती. या कामांमुळे जलसंधारणाला बळकटीही मिळाली. आता दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात १३१ गावांमध्ये १३१ कोटी ७० लाख रुपये किमतीची १६७४ कामे केली जाणार आहेत. या कामांना जिल्हा समितीमार्फत मंजुरी दिली आहे.
त्यातील ७३९ जलसंधारणाच्या कामांना १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रशासकीय मान्यताही दिली. या अभियानातंर्गत मंजूर असलेल्या कामांपैकी प्रशासकीय मान्यता दिलेल्या ७३९ कामांमधून आतापर्यंत ७२ कामे पूर्ण झाली आहेत. २७ कामे सद्यस्थितीत सुरु आहेत.
उर्वरित ६४० कामांची निविदा प्रक्रिया सुरु आहे. या टप्यात जलयुक्त शिवार अभियानाची कामे जलसंधारण, कृषी, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे व वन विभागामार्फत केली जाणार आहेत. गॅबियन बंधारे, व्दारयुक्त्त सिमेंट बंधारे, सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण व रुंदीकरण, कोल्हापूरी बंधारे दुरुस्ती, गावतलाव दुरुस्ती, संरक्षक वनचर आदी कामे प्रस्तावित आहेत.
जलसंधारणाला पूरक
ही कामे पावसाचे पाणी जमिनीत जिवरण्यासाठी महत्त्वाची भूमिका वठवतात. पहिल्या टप्प्यात ठिकठिकाणी नदी-नाला खोलीकरण, बंधाऱ्यांमुळे पाणीपातळी वाढण्यास मोठी मदत झालेली आहे. यामुळे जलयुक्तच्या कामांची गेले काही महिने मागणी केली जात होती. शासनाने दुसरा टप्पा जाहीर केल्याने आता ही मागणी पूर्णत्वास गेली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.