अमरावती ः कापूस एकाधिकार मोडीत काढीत सीमापार कापूस आंदोलनाची (Cotton Protest) हाक देणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला होता.
महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेवरील बहिरम (Bahiram Cotton Protest) येथे २४ जानेवारी १९७५ रोजी घडलेल्या या घटनेतील शहीद शेतकऱ्यांच्या स्मृती श्रद्धांजली सभेचे आयोजन बहिरम आंदोलन समितीतर्फे मंगळवारी (ता.२४) बहिरम येथे करण्यात आले आहे.
राज्यात १९७० पासून कापूस एकाधिकार योजना राबविण्यात आली. यातून शेतकऱ्यांच्या लुटीचे सत्र सुरु झाले. कापसाची कवडीमोल दरात शासनाकडून खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये या विषयी रोष वाढला होता.
यातूनच संघर्षाची ठिणगी पडली. दादासाहेब हावरे, विनायक कोरडे, भाऊ साबळे, शंकर बोबडे, केशरबाई सिकची, मामराज खंडेलवाल या सर्वांसह १४०० ते १५०० कापूस भरलेल्या बैलगाड्या घेऊन शेतकरी महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील बहिरम येथे जमले होते. यावेळी पोलिसांनी हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी अचानक लाठीहल्ला केला.
दरम्यान, जमाव जुमानत नसल्याचे पाहून पोलिसांनी गोळीबार केला. त्यात पथ्रोट येथील शेतकरी विठ्ठलराव दुतोंडे शहीद झाले. सोबतच दादासाहेब हावरे, भाऊसाहेब साबळे हे जखमी झाले. बैलगाड्यांचे नुकसान झाले.
बैलांनाही मार लागला. या आंदोलनाची आठवण आणि शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ४७ वा स्मृतीदिन सोहळा आयोजित करण्यात येईल. शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी नेते प्रकाश साबळे यांनी केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.