Satara Latest News : अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) राज्यात अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे. यावर काही ठिकाणी स्थानिक अधिकारी फिरकलेच नाहीत, तर काही ठिकाणी त्यांनी पाहणी केली. पण १५ दिवस झाले तरी शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.
राज्यकर्त्यांनी पक्षाचा विचार न करता सर्वांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा,’’ अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी श्री. पवार मंगळवारी (ता.९) साताऱ्यात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या मदतीबाबत राज्य सरकारकडून कोणतेच पाऊल उचलले गेलेले नाही, असे श्री. पवार यांना विचारण्यात आले. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. कांदा पीक नासले आहे. भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.
या नुकसानीची पाहणी करण्यास काही ठिकाणी स्थानिक अधिकारी गेलेले नाहीत. तर काही ठिकाणी अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी केलेली आहे.
पण १५ दिवस झाले, तरी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून कोणतीही मदत जाहीर झालेली नाही.
अशा संकटाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पक्ष व राजकारण बाजूला ठेवून सर्वांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे.’’
‘...तर कर्नाटकात भाजपचे ‘मिशन कमळ’’
कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीबाबत श्री. पवार म्हणाले, ‘‘भाजपने महाराष्ट्रात ‘मिशन कमळ’च्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहकाऱ्यांना फोडून सत्ता स्थापन केली. तसेच भाजपला कर्नाटक निवडणुकीत जनतेने नाकारले, तर ‘मिशन कमळ’च्या माध्यमातून लोकशाही उद्ध्वस्त करून सत्ता मिळविण्याचे सूत्र त्यांनी ठेवले आहे.’’
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.