सोलापूर : खामगाव (ता. बार्शी) येथील आर्यन शुगरने (Aaryan Sugar ) आठ वर्षांपूर्वी ऊस घातलेल्या शेतकऱ्यांच्या उसाची ‘एफआरपी’ची (FRP) रक्कम अद्याप दिलेली नाही.
सध्या हा कारखाना ‘येडेश्वरी’ शुगरकडून सुरू केला जात आहे. शेतकऱ्यांची थकीत बिले दिल्याशिवाय बॉयलर प्रदीपन होऊ देणार नाही, असा इशारा जनहीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला.
‘आर्यन शुगर’कडे २०१४ -१५ मध्ये ऊस घालणाऱ्या मोहोळ, बार्शी, उत्तर सोलापूर तालुक्यांसह उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे २१ कोटी ५० लाख रुपये अद्याप थकीत आहेत. हा कारखाना सध्या ‘येडेश्वरी शुगर’च्या ताब्यात आहे.
येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात सांगितले होते, की दिवाळीपूर्वी थकीत उस बिले देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार.
परंतु तो शब्द न पाळल्यामुळे शेतकऱ्यांचा सोनवणे यांच्यावरचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे बॉयलर प्रदीपनचा कार्यक्रम बंद पाडणार असल्याचा इशारा देशमुख यांनी दिला.
या वेळी मराठवाडा विभागाचे अध्यक्ष चंद्रकांत खताळ, अमोल जाधव, रवींद्र मुठाळ, अंकुश वाघमारे, हेमंत देशमुख, परमेश्वर जगदाळे, बाळासाहेब राठोड, देविदास राठोड आदी उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.