Chana MSP
Chana MSP Agrowon
ताज्या बातम्या

Chana MSP : एसएमएस प्राप्त शेतकऱ्यांचाच हरभरा हमीभावाने खरेदी होणार

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Akola Chana Market Update : ज्या जिल्ह्यात उद्दिष्ट वाढवून पुन्हा हरभरा खरेदी (Chana Buying) सुरू होत आहे, तेथे पहिल्या टप्यात ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी एसएमएस पाठवण्यात आले आहेत, त्यांचाच शेतमाल खरेदी केला जाणार आहे.

एसएमएस पाठवलेल्यांची खरेदी होईपर्यंत नव्याने संदेश दिले जाणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

राज्यात सात ते आठ जिल्ह्यांत यंदा हरभरा खरेदीचे उद्दिष्ट संपल्याने काही ठिकाणी जवळपास महिना भरापासून खरेदी प्रक्रिया बंद होती.

मध्यंतरी शासनाने अशा जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात उद्दिष्ट वाढवत हरभरा खरेदीस परवानगी दिली. त्यानुसार संबंधित जिल्ह्यात खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.


यंदाच्या हंगामात १४ मार्चपासून ‘नाफेड’च्या माध्यमातून हमीभाव ५३३५ रुपये प्रतिक्विंटल दराने हरभऱ्याची खरेदी सुरू करण्यात आलेली आहे. ३१ मार्चपर्यंत यासाठी शेतकऱ्यांची नावनोंदणी करण्यात आली.

हजारो शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. बाजारात हरभरा ४००० ते ४५०० दरम्यान विकत असल्याने हमीभाव केंद्रावर विक्रीसाठी शेतकऱ्यांचा ओढा दिसून आलेला आहे.


यंदा जिल्हानिहाय उत्पादकता काढत त्यापैकी २५ टक्के प्रमाणात शेतीमाल खरेदीचे उद्दिष्ट नेमून देण्यात आले होते. हाच निकष बाधक ठरला.

या तोकड्या उद्दिष्टानुसार काही दिवसांतच खरेदीचा टप्पा ओलांडला. त्यामुळे बुलडाणा, अकोल्यासह सहा ते सात जिल्ह्यांत खरेदी बंद झाल्याने खळबळ उडाली होती.

लोकरेट्यानंतर यंत्रणांनी धोरणाचा पुनर्विचार करीत नव्याने उद्दिष्ट वाढवून दिले. त्यानुसार खरेदी सुरू केली जात आहे. परंतु ही खरेदी करीत असताना यापूर्वी ज्यांना एसएमएस पाठवले त्यांचाच हरभरा प्राधान्याने खरेदी होणार आहे. नव्याने एसएमएस पाठवले जाणार नाहीत.

जेथे एसएमएस पाठवायचे असतील तेथे जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्यक करण्यात आली आहे. याशिवाय आता दररोज एका शेतकऱ्याचा २५ क्विंटल प्रमाणे हरभरा खरेदी होईल.

प्रति सातबारा १०० क्विंटल खरेदीची मर्यादा ठरवून दिली. सोबतच शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी खरेदी केंद्र बंद राहील. नवीन उद्दिष्टानुसार सुरू झालेली खरेदीसुद्धा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

भाव फरकाची रक्कम द्या ----
हरभरा खरेदीबाबत अकोला जिल्ह्याला मिळालेले वाढीव उद्दिष्ट आणि खरेदीला लावण्यात आलेल्या अटी व शर्थी शिथिल कराव्यात तसेच नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांचा हरभरा राज्य सरकारने खरेदी करावा किंवा भाव फरकाची रक्कम शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांनी केली आहे.

या बाबत मंगळवारी (ता. नऊ) त्यांनी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. मध्यंतरी उद्दिष्ट पूर्ण झाल्याने अचानक खरेदी बंद केली. यामुळे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आलेली आहे. मुळातच जिल्ह्याला जे वाढीव उद्दिष्ट मिळालेले ते अतिशय तोडके आहे. सध्या हजारो नोंदणीकृत शेतकऱ्यांकडे हरभरा पडून आहे.

त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. आता हा हरभरा कुठे विकावा. अकोला जिल्ह्यात जवळपास ३७ हजार शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती. मात्र यात चार लाख १२ हजार ९०२ क्विंटलच हरभरा खरेदी करण्यात आला आहे.

आता शेतकरी व्यापाऱ्याला सातशे ते आठशे रुपये तोटा सहन करून कमी भावाने हरभरा विकत आहे. तरी सरकारने शेतकरी हिताची ठोस भूमिका घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही गवळी यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

SCROLL FOR NEXT