Maharashtra politics
Maharashtra politics Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Politics : सत्यजित तांबे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात

Team Agrowon

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nashik Graduate Election) सोमवारी (ता. १६) अर्ज माघारीच्या दिवशी सहा उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर रिंगणात अपक्ष सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यासह १६ उमेदवार आहेत.

भारतीय जनता पक्षाकडून (BJP) एकही उमेदवार नसल्याने तांबे यांच्यासमोर फारसे मोठे आव्हान नसल्याचे दिसून येत आहे;

मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे तांबे यांचा प्रभावी जनसंपर्क व पाटील यांना मिळालेला पाठिंबा यामुळे लढत रंगणार असल्याची स्थिती आहे.

महाविकास आघाडीमध्ये उमेदवाराबाबत अद्याप गोंधळ आहे. या तीन पक्षांत सावळागोंधळाची स्थिती आहे.

दुसरीकडे तांबे यांचे तळागाळातील नेटवर्क, कामाचा अनुभव व संघटन कौशल्य यामुळे तांबे हे किती मतांनी निवडून येतात एवढीच उत्सुकता निवडणुकीत शिल्लक राहिली असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी जानेवारी अखेरीस मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे व माघारीची प्रक्रिया पार पडली.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. सत्यजित यांनी अपक्ष व काँग्रेस असे दोन अर्ज दाखल केले होते.

काँग्रेसने रविवारी (ता. १५) डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसमधून निलंबित केल्याचे घोषित केले. त्या अनुषंगाने सत्यजित यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली.

यापूर्वी भाजपकडून उमेदवारी करण्यास इच्छुक असलेल्या शुभांगी पाटील यांचे नाव अचानक चर्चेत आले. सत्यजित तांबे यांनी दाखल केलेली अपक्ष उमेदवारी व भारतीय जनता पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही.

शिवाय अन्य कुणालाही पाठिंबा जाहीर केला नाही. त्यामुळे सत्यजित तांबे यांचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. हे पाहता शुभांगी पाटील यांनी नाशिकमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

काँग्रेसनेही शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

त्यातही शुभांगी पाटील यांचा मोबाइल नॉट रिचेबल होता. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. माघारीनंतर आता १६ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी रमेश काळे यांनी दिली.

या उमेदवारांनी घेतली माघार

डॉ. सुधीर सुरेश तांबे, अमोल बाळासाहेब खाडे, दादासाहेब पवार, धनंजय जाधव, राजेंद्र निकम, धनराज विसपुते या सहा उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले.

हे उमेदवार रिंगणात

सत्यजित सुधीर तांबे (अपक्ष), रतन कचरू बनसोडे (वंचित बहुजन आघाडी), सुरेश भीमराव पवार (नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी), अनिल तेजा, अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर, अविनाश महादू माळी, इरफान मो. इसहाक, ईश्वर पाटील, बाळासाहेब घोरपडे, ॲड. जुबेर नासिर शेख, ॲड. सुभाष राजाराम जंगले, नितीन सरोदे, पोपट बनकर, शुभांगी पाटील, सुभाष चिंधे, संजय माळी (सर्व अपक्ष).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT