Mahavikas Aghadi | Mahavikas Aghadi Maha Morcha | Maha Morcha
Mahavikas Aghadi | Mahavikas Aghadi Maha Morcha | Maha Morcha Agrowon
ताज्या बातम्या

Mahavikas Aghadi Morcha : कोश्यारींना हटवा, अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल

टीम ॲग्रोवन

मुंबई : ‘‘राज्यपालांनी महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive Statement) केल्यानंतर त्यांना हटविण्यासाठी मोर्चाच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आंदोलन (Protest) सुरू आहे. मात्र त्यांना तातडीने हटविले नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल,’’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी (ता. १७) दिला.

मुंबईत काढण्यात आलेल्या महामोर्चावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ आयोजित सभेत त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. भायखळ्यातून सुरू झालेला मोर्चा जे. जे. पुलावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील रस्त्यावर आला. या ठिकाणी सभा झाली.

मोर्चात राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी रस्ते फुलून गेले होते. मोर्चात सकाळी नऊपासून कार्यकर्ते सहभागी होऊ लागले. हातात फलक घेतलेले कार्यकर्ते सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, समाजवादी पक्ष, शेकाप आणि अन्य महाविकास आघाडीचे घटकपक्ष या मोर्चात सहभागी झाले. खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध पक्षांचे आमदार, खासदार सहभागी झाले होते.

पवार म्हणाले, ‘‘७० वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्रासाठी महामोर्चे निघाले. अनेकांच्या त्यागातून हा महाराष्ट्र तयार झाला आहे. तरीही अजून मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आलेला नाही. त्यासाठी आपण लढत असताना सत्ताधारी पक्ष मात्र चुकीची भूमिका घेत आहे. ज्यांच्याकडे सत्ता आहे, तेच युगपुरुषांबद्दल चुकीची भाषा वापरत आहेत. देशात अनेक राजे, संस्थानिक होऊन गेले, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आजही सर्वांमुखी असण्याचे कारण म्हणजे त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य. सामान्य माणसांसाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवाजी महाराजांचा अवमान मंत्री आणि राज्यपाल करत आहेत.’’

‘‘राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील ही महाराष्ट्राच्या आदराची स्थाने आहेत. या विभूतींनी महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविला. ज्ञानदानाच्या क्षेत्रात या व्यक्तींनी अनेक संकटे झेलून स्वाभिमानाने काम केले. त्यांच्याबाबत राज्यपालांसारखी व्यक्ती असभ्य बोलत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. आज आम्ही लोकशाहीच्या मार्गाने, शांततेने राज्यपाल कोश्यारी यांना हटविण्याची मागणी करत आहोत. लवकरात लवकर त्यांची हकालपट्टी करावी, अन्यथा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही,’’ असा इशारा पवार यांनी दिला.

‘‘आजच्या महामोर्चाने महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या मनात धडकी भरवली आहे. हे सरकार आल्यापासून राज्यातील महापुरुषांचा अवमान केला जात आहे. यापुढे असे घडू नये यासाठी राज्य सरकारने कडक कायदा करावा, त्यासाठी अधिवेशनात विधेयक आणावे,’’ अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. ‘‘राज्य सरकार फेब्रुवारीपर्यंत राहत नाही,’’ असे भाकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.

‘‘मी तर यांना राज्यपाल मानतच नाही’

‘‘आग्ऱ्याहून सुटकेची तुलना खोके घेऊन पळणाऱ्यांशी करता. यांनी पाठीत नव्हे आईच्या कुशीत वार केला आहे. मुंबईचे लचके तोडायचे, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवायची, उद्योग पळवून न्यायचे आणि राज्य खिळखिळे करायचे हा यांचा उद्योग आहे,’’ असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला. ‘‘मी तर यांना राज्यपाल मानतच नाही. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्या पदावर त्या उंचीचा माणूस बसावा. मात्र केंद्रातील कुणाच्या घरात काम करणाऱ्याला इथे आणून बसवत असाल आणि ते रोज टपल्या मारत असतील तर आम्हीही त्यांना त्याच भाषेत उत्तर देऊ,’’ असेही ठाकरे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT