Kolhapur News : यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने म्हणावी तशी साथ न दिल्याने पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील मागच्या अडीच महिन्यात म्हणजे ८५ दिवसांतील फक्त ३५ दिवस पावसाने हजेरी लावली आहे. तर उर्वरित ४५ दिवस कोरडे गेले असून या कालावधीत एक थेंबही पाऊस झालेला नाही.
त्यामुळे वार्षिक सरासरीच्या केवळ ४२ टक्केच पाऊस झाला. ऑगस्ट महिना संपत आला तरी पावसाने समाधानकारक स्थितीही गाठली नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वच क्षेत्रात चिंता वाढली आहे.
जून महिन्यापासून मान्सूनला सुरूवात होते पण जुलै महिना सोडला तर मागच्या ८० दिवसांच्या कालावधीत केवळ सरासरी ७९१.३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. पावसाचा हंगाम जेमतेम सव्वा महिना राहिला आहे. त्यामुळे यंदा वार्षिक सरासरी तरी जिल्हा गाठणार का? याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. ऐन पावसाळ्यात ढग कोरडे ठाक दिसत असल्याने सगळ्यांचीच चिंता वाढली आहे.
गेल्या वर्षी १९ ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात सरासरी १०२१ मिलीमीटर पाऊस झाला होता. वार्षिक सरासरीच्या ७६ टक्के झाला, गत वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत २३० मिलीमीटर पाऊस कमी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात साधारणता मार्च पासूनच वळीव सुरू होतो आणि मेपर्यंत पाच ते सहा जोरदार वळीव पाऊस कोसळतो, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सून हळूहळू सक्रिय होतो.
जुलै, ऑगस्ट मध्ये धुवाँधार पाऊस कोसळत राहतो. मात्र, यंदा मेघराजाच्या मनात काही वेगळेच आहे. मार्च ते मे या कालावधीत वळीव झाले तेही जेमतेमच त्यानंतर २५ जूनला मान्सून सक्रिय झाला. जुलै महिन्यातील आठ-दहा दिवस वगळता जोरदार पाऊस कोसळलाच नाही. ऑगस्ट महिन्यातील १९ दिवस सरले पण सरासरी ९२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.