Kolhapur News : ‘‘केंद्राने साखर निर्यातीला पुढील काळात परवानगी न दिल्याने साखरेचे दर कमी होतील. परिणामी, साखर उद्योगाला अडचणी निर्माण होतील. केंद्राने याबाबत योग्य निर्णय घ्यावा यासाठी देशपातळीवरील संघटना प्रयत्न करीत आहेत,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता. २६) येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. १४ सप्टेंबरपर्यंत साखर निर्यात करावी असे आदेश आहेत. यानंतर साखर निर्यात होऊ शकणार नाही. यामुळे एकरकमी एफआरपी देण्याबाबतही अडचणी निर्माण होतील, असेही श्री पवार यांनी सांगितले.
राज्यभरात पावसाने ओढ दिल्याने तोंडाशी आलेली पिके करपत आहेत, मात्र राज्य सरकारचे याच्याकडे लक्ष नाही. आतापर्यंत पंचनामे सुरू करायला हवे होते, पण सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसल्याचे यातून दिसून येत आहे. अनेक ठिकाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. माझ्या दौऱ्यामध्येही पीक परिस्थिती नाजूक असल्याचे आढळून येत आहे. राज्य सरकारने तातडीने याबाबत पावले उचलणे गरजेचे असल्याचेही शरद पवार या वेळी म्हणाले.
सत्तेचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटलेल्या अनेक नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लावला. यात मंत्री हसन मुश्रीफ यांचाही समावेश आहे. यावरून हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी पक्षावर टीका केली होती. मुश्रीफ यांच्या आरोपाला उत्तर देताना शरद पवार यांनी त्यांच्यावर टीका केली.
‘‘पक्षाने अजून तुमच्यासाठी काय करायला हवे आहे. तुरुंगात जाऊन आलेले नेते पक्षाबद्दल काही बोलत नाहीत. मात्र तुरुंगात न गेलेले नेते याबद्दल बोलतात,’’ अशी टीका शरद पवारांनी मुश्रीफांचे नाव न घेता केली. ‘‘आमदार फुटले म्हणून पक्ष फुटला असे नाही. सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचे काम भाजपकडून केले जात आहे.
याविरोधात आम्ही एकजुटीने काम करणार आहोत. काही आमदार बाहेर पडले म्हणजे पक्ष फुटला असे नव्हे. पक्षात नवीन नेतृत्व तयार करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सभांना तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे, ही सकारात्मक विचारांची सुरुवात आहे,’’ असेही पवार या वेळी म्हणाले.
‘... तर शेतकऱ्यांना किंमत मोजावी लागेल’
कोल्हापूर येथे शुक्रवारी (ता. २५) झालेल्या जाहीरसभेत बोलताना शरद पवार म्हणाले, की कोल्हापूर उसाचे पीक घेणारा जिल्हा आहे; मात्र सध्या केंद्र शासन निर्यातीच्या साखरेवर बंधन घालण्याचा विचार करत आहे. सप्टेंबरनंतर साखर परदेशात नेता येणार नाही. असे झाले, तर ऊस उत्पादकाला त्याच्या घामाची किंमतही मिळणार नाही. याची मोठी किंमत कोल्हापूरच्या शेतकऱ्याला मोजावी लागेल,’’ अशी टीकाही त्यांनी केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.