Vegetables Agrowon
ताज्या बातम्या

Residue Free Vegetable : रसायनमुक्त भाजीपाला क्लस्‍टरची मागणी शासनाकडून बेदखल

Team Agrowon

Pune News : वाढत्या रसायनांच्या वापरामुळे शेती, माती, पाण्याच्या आरोग्यासह मानवी आणि पशुधनाच्या आरोग्यावर होणाऱ्या विपरित परिणामांना आळा घालण्याबरोबरच, तरुण शेतकऱ्यांना कृषी उद्योजकतेकडे आकर्षित करण्यासाठी जुन्नर- आंबेगाव परिसरात तळेगाव फ्लोरिक्लचर पार्कच्या धर्तीवर रसायनमुक्त भाजीपाला उत्पादन आणि क्लस्टरच्या शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची मागणी सरकार दरबारी अद्याप बेदखल आहे. या मागणीसाठी आढळराव पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरूर हे तालुके कृषिप्रधान तालुके आहेत. या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळे आणि भाजीपाल्यांचे उत्पादन होत असून, या तालुक्यांमधून देशभरात भाजीपाल्याचा पुरवठा होतो आहे. तर काही प्रमाणात भाजीपाला निर्यातदेखील होत आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या तालुक्यांमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

याचा विपरीत परिणाम माती, पाणी आणि मानवी आरोग्यासह पशुधनावर देखील होऊ लागला आहे. तसेच रासायनिक खते आणि कीटकनाशकांचे अंश सार्वजनिक जलस्रोतामध्ये आढळून आले आहेत.

यामुळे शेतीमधील वाढत्या रासायनिक खतांच्या आणि कीटकनाशकांच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील फ्लोरिक्लचर पार्कच्या धर्तीवर जुन्नर तालुक्यात रसायनमुक्त भाजीपाला क्लस्टर उभारणीची मागणी आढळराव पाटील यांनी २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

सत्तेत असूनही मागणी बेदखल

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील जाहिरनाम्यामध्ये क्लस्टर उभारणीचे आश्‍वासन आढळराव पाटील यांनी दिले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर या मागणीचा पाठपुरावा आढळराव यांनी सुरू ठेवून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पत्र दिले. ठाकरे यांनी या संकल्पनेचे कौतुकदेखील केले. मात्र कोरोना काळात ही मागणी मागे पडली.

यानंतर झालेल्या सत्तांतरानंतर मागणीचा पाठपुरावा कायम ठेवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १३ मार्च २०२३ रोजी पत्र दिले. मात्र या पत्रावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, पणनमंत्री अब्दुल सत्तार आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील शिंदे गटात असून, यांच्याकडून देखील मागणीची पूर्तता होणार का, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करत आहेत.

रसायनमुक्त भाजीपाला क्लस्टरच्या माध्यमातून शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा, क्लस्टरच्या माध्यमातून स्पेन, इस्राईल, नेदरलॅँड यांसारख्या कृषी क्षेत्रातील प्रगत देशांची गुंतवणूक शेतीक्षेत्रात वाढावी यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. चांगल्या कामांना विलंब होऊ शकतो. मात्र मी पाठपुरावा सोडलेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलेले आहे. लवकरच उद्योगमंत्री उदय सामंत आणि पणनमंत्री अब्दुल सत्तार यांना पत्र देऊन भेट घेणार आहे.
- शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार आणि शिवसेना उपनेते

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT