Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविमा अर्ज भरण्यास गुरुवारपर्यंत मुदतवाढ

Team Agrowon

Pune News : पंतप्रधान पीकविमा योजनेच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन विमा अर्ज करण्याकरिता केंद्र सरकारने गुरुवारपर्यंत (ता. ३) मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, विमाधारकांची संख्या आता दीड कोटीच्या पुढे गेली असून पीकविमा योजनेत सहभागाचे यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत.

राज्यभरात ठिकठिकाणी अतिपाऊस झाला आहे. त्यामुळे विस्कळीत झालेल्या वाहतुकीमुळे शेतकऱ्यांना अर्ज भरता आले नव्हते. तसेच, विमा योजनेचे संकेतस्थळ चालविणारा ‘सर्व्हर’ वारंवार ‘डाउन’ होत होता. परिणामी, अनेक जिल्ह्यांमधील शेतकरी विमा अर्ज भरू शकले नव्हते.

राज्याने केंद्राशी ही स्थिती कळवून अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर काल (ता. ३१) सकाळी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पत विभागाचे सहायक आयुक्त सुनील कुमार यांनी कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना एक पत्र पाठविले. त्यात अर्ज भरण्याची मुदत ३१ जुलैऐवजी ३ ऑगस्टपर्यंत करण्यास मान्यता देण्यात आल्याचे स्पष्ट केले.

‘‘भूमि अभिलेख विभागाच्या संगणकीय सेवेमधील तांत्रिक बिघाड होणे, आधार संलग्न सेवांमध्ये येणारा व्यत्यय येणे, यामुळे विमा अर्ज भरताना अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रीय पीकविमा संकेतस्थळावर काम करताना सार्वजनिक सुविधा केंद्रांनाही (सीएससी) समस्या उद्भवत होत्या. तशा तक्रारी बहुतेक विमा कंपन्यांकडून येत होत्या.

त्यामुळे कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अर्ज दाखल करण्यासाठी निश्चित केलेल्या अंतिम मुदतीचा फेरविचार करण्यात आला आहे. मात्र, अंतिम मुदतीला दिलेल्या तीन दिवसांच्या वाढी व्यतिरिक्त विमा योजनेतील आधीच्या सर्व मार्गदर्शक सूचना कायम ठेवण्यात आलेल्या आहेत,’’ असे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पत्रात नमुद करण्यात आले आहे.

दरम्यान, सोमवारी (ता.३१) सकाळपर्यंत शेतकऱ्यांनी एकूण एक कोटी ५० लाख ४७ हजार विमा अर्ज दाखल केले. यात १.४५ कोटी शेतकरी बिगर कर्जदार होते. कर्जदार शेतकरी पाच लाखाच्या आसपास आहेत. गेल्या हंगामात ९६ लाख अर्ज आले होते.

यंदा खरिपाच्या १४२ लाख हेक्टर क्षेत्रापैकी शेतकऱ्यांनी आतापर्यंत ९९ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करून घेतले आहे. त्यापोटी विमा संरक्षित रक्कम ४८ हजार कोटींच्या पुढे गेली आहे. चालू खरीप हंगामात मॉन्सूनची वाटचाल बेभरवशाची असल्यामुळे अर्ज दाखल न केलेल्या शेतकऱ्यांनी पुढील दोन दिवसात अर्ज दाखल करणे गरजे आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

चोवीस तासांत सव्वा सात लाख अर्ज

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीही ट्विट करीत पीकविमा योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळाल्याचे स्पष्ट केले. ‘‘अर्ज भरताना काही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे राज्याच्या विनंतीनंतर केंद्राने योजनेला तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. गेल्या चोवीस तासांत सव्वा सात लाख अर्ज दाखल केले आहेत. मुदतवाढ मिळाल्याने आता उर्वरित शेतकऱ्यांनी वेळेत आपले विमा अर्ज दाखल करावेत,’’ असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT