Kharif crops Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Crops : पावसाच्या ओढीमुळे पिके ताणावर

Kharif Season : मराठवाड्यातील हलक्या, मध्यम जमिनीतील पिकांना धोका वाढला़; शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

Team Agrowon

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Marathwada Rain Update : छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाने दिलेल्या ओढीने पीक ताणावर गेली आहेत. ऐन पीकवाढीच्या कालावधीत पावसाची आवश्‍यकता आहे. उशिरा लागवड केलेल्या पिकांनी जमीनच सोडली नसल्याची स्थिती आहे. हलक्या, मध्यम जमिनीतील अल्प कालावधींच्या पिकांना धोका वाढला असून जास्त कालावधीच्या पिकांनाही पावसाच्या खंडाचा फटका बसणार हे स्पष्ट आहे.

मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी सर्वसाधारण क्षेत्र ४८ लाख ५७ हजार १५२ हेक्टर आहे. त्यामध्ये लातूर कृषी विभागांतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांतील २७ लाख ६६ हजार ९५४ हेक्टरसह छत्रपती संभाजीनगर कृषी विभागांतर्गत येत असलेल्या तीन जिल्ह्यांतील २० लाख ९० हजार १७८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या सर्वसाधारण क्षेत्रापैकी प्रत्यक्षात ४६ लाख ३३ हजार १४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.पेरणी झालेल्या क्षेत्रात २४ लाख ६६ हजार ७६८ हेक्टरवर सोयाबीनची, तर १३ लाख ३९ हजार ६२३ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली आहे. उर्वरित क्षेत्रावर खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग आदी पिकांच्या पेरणीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे.

यंदा पाऊस लांबल्याने आधीच कपाशी या प्रमुख पिकासह मूग, उडीद, तूर, मका, बाजरी व खरीप ज्वारी या पिकांची अपेक्षित पेरणी झाली नाही. जी पेरणी झाली तिलाही विलंब झाला. आता पुन्हा एकदा पावसाची ओढ पिकांच्या मानगुटीवर बसली आहे. बहुतांश भागातील हलक्या व मध्यम जमिनीतील पिके ऊन धरत आहेत. सिंचनाची सोय असलेल्या काही भागांत ठिबक व तुषार सिंचनाने पीक वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. ‘आडातच नाही तर पोहरात येणार कुठून’ ही स्थिती अनेक विहिरींची असल्याने सिंचनावरही मर्यादा आहेत. त्यामुळे पिकासाठी धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.


काही दिवसांपासून बऱ्याच भागांमध्ये पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होत असल्याने पिकावर पाण्याचा ताण पडत आहे. त्यामुळे पिके कोमेजून जात आहेत. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शिफारशीत उपाय करावे.
- डॉ सूर्यकांत पवार,
सहयोगी संशोधन संचालक तथा विस्तार कृषी विद्यावेत्ता,
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, पैठण रोड छत्रपती संभाजीनगर

तज्ज्ञांनी सुचविलेले उपाय...
- पिकांना ताण सहन करण्यासाठी १३:००:४५ या विद्राव्य खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
- हलकी आंतर मशागत करावी जेणेकरून जमिनीतून केस आकर्षणाद्वारे होणारा ओलाव्याचा ऱ्हास कमी करता येईल
- पाण्याची उपलब्धता कमी असल्यास शक्य असेल त्या ठिकाणी एक ओळ आड पाणी द्यावे. किंवा तुषार आणि ठिबक सिंचनाने पाणी द्यावे.
- शिफारशी नुसार कीटकनाशके, बुरशीनाशके यांचा वापर करावा.
- कमी अंतराच्या पिकामध्ये चार ओळींनंतर चर काढावे. कापूस, तूर पिकामध्ये एक दोन ओळींनंतर चर काढावेत. त्यामुळे मूलस्थानी जलसंधारण होण्यास मदत होईल.

१७० मंडलांत पावसाची ओढ अधिक
मराठवाड्यातील एकूण ४६८ मंडलांपैकी १७० मंडलांत अपेक्षित पावसाच्या २५ ते ७५ टक्के दरम्यानच पाऊस आजवर झाला आहे. त्यामुळे या मंडलांमध्ये पावसाच्या ओढीचा परिणाम अधिक आहे. यापैकी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी व नांदेड जिल्ह्यांतील २१ मंडलांत अपेक्षेच्या २५ ते ५० टक्केच पाऊस झाला आहे. तब्बल १६९ मंडलांत अपेक्षेच्या ७५ ते १०० टक्क्यांदरम्यान, तर केवळ १२९ मंडलांत अपेक्षेच्या पुढे जाऊन पाऊस झाल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT