नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः देशातील तृणधान्यांच्या एकूण उत्पादनापैकी (Millet Production) १२ टक्के उत्पादन पंजाबमध्ये होत असल्याने हे राज्य महत्त्वाचे आहे.
मात्र, हवामान बदलामुळे (Climate Change) पंजाबमध्ये २०५० पर्यंत कापसाचे उत्पादन (Cotton Production) ११ तर मक्याचे उत्पादन (Maize Production) १३ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज पंजाब कृषी विद्यापीठातील वैज्ञानिक आणि कृषी अर्थतज्ज्ञांनी वर्तविला आहे.
हवामान विभागाच्या ‘मौसम’ नियतकालिकामध्ये याबाबतचे संशोधन प्रकाशित झाले आहे.
संशोधकांनी १९८६ ते २०२० दरम्यान या कृषिप्रधान राज्यात पडलेल्या पावसाचा आणि तापमानाचा डेटाचा अभ्यास करून तांदूळ, मका, कापूस, गहू आणि बटाटा या पाच पिकांवरील हवामान बदलाचा संभाव्य परिणाम वर्तविला आहे. पंजाब कृषी विद्यापीठाच्या लुधियाना, पातियाला, फरिदकोट, भटिंडा आणि एसबीएस नगर या पाच हवामान वेधशाळांतील डेटाही संशोधकांनी जमविला.
संशोधक व कृषी अर्थतज्ज्ञ सनीकुमार, वैज्ञानिक बलजिंदर कौर सिदाना आणि पीएचडीची विद्यार्थिनी स्मिली ठाकूर यांनी सांगितले, की पावसाच्या पद्धतीमधील बदलापेक्षा तापमानातील वाढीमुळे दीर्घकालीन हवामान बदल घडून येत आहेत.
सर्वांत आश्चर्यकारक निष्कर्ष असा आहे, की किमान तापमानातील बदलामुळे सर्व हंगामांतील सरासरी तापमानात बदल घडून आले आहेत. किमान तापमानात वाढ झाल्याचे यातून दिसून आले आहे.
हे तांदूळ, मका आणि कापसासाठी हानिकारक आहे. मात्र, बटाटा आणि गहू या पिकांसाठी किमान तापमान वाढणे फायदेशीर ठरेल.
हवामान बदलाचा खरीप आणि रब्बी पिकांवर वेगवेगळा परिणाम होईल. खरीप पिकांमध्ये तांदूळ, कापसापेक्षा मका तापमानाला अधिक संवेदनशील आहे. त्यामुळे, २०५० पर्यंत पंजाबमधील मक्याचे उत्पादन १३ टक्के, कापूस ११ तर तांदळाचे १ टक्क्याने घटेल. २०८० पर्यंत मका, कापसाचे उत्पादन २४ टक्के, तांदळाचे एक टक्क्यांपर्यंत घटेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.