
कुजणारे पदार्थ बागेबाहेर न कुजविता थेट बागेत कुजत राहिल्याने जमिनीचे शुद्धीकरण होते. यामुळे मालाचा दर्जा अत्युच्च मिळतो. संतुलित पोषणामुळे कीडनाशक, बुरशीनाशकांच्या फवारण्या खूप कमी होतात. बागेत सेंद्रिय पदार्थ भरपूर झाल्याने रासायनिक खतांची (Chemical Fertilizers) कार्यक्षमता वाढते, वापर कमी होतो. पाणी अतिशय कमी लागते. असे विविध बागायतदारांचे अनुभव आहेत.
राज्यातील बरेच शेतकरी विविध पिकांमध्ये तण व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करत आहेत. त्यांचे अनुभव अभ्यासण्यासारखे आहेत. पावसाळ्यापूर्वी अनेक शेतकरी द्राक्ष बागेतील दोन ओळींत मशागत करून रान तयार करून घेतात. पावसाळ्यात या पट्ट्यात एखादे हिरवळीचे पीक लावले जाते. पुढे फळ छाटणीपूर्वी रोटाव्हेटरने जमिनीत गाडले जाते.
त्यानंतर पुढील कामे केली जातात. आता फळ छाटणी करावयाची असल्याने रान स्वच्छ केले जाते. शेतकऱ्याच्या डोक्यात असे चक्र असते, की आपण महागडी खते वापरतो, ती वेलींनाच मिळणे गरजेचे आहे. ही अन्नद्रव्ये तणांनी संपवू नयेत, तसेच तण आणि पिकाची स्पर्धा होऊ नये म्हणून बाग तणमुक्त ठेवली जाते. पुढे छाटणी, फुलधारणा, फळधारणा, फुगवण अशा वाढीच्या अवस्थेत तणांची स्पर्धा टाळणे गरजेचे आहे.
द्राक्ष शेतीतील अनुभव ः
एका बागायतदाराने पावसाळ्यात बागेमध्ये तणे १२० ते १५० सेंमी उंचीपर्यंत वाढविली. छाटणीपूर्वी तणे अवजाराने आडवी केली आणि त्यावर तणनाशकाची फवारणी केली. अलीकडे पाऊस अधूनमधून डिसेंबर अखेरपर्यंत चालूच असतो. त्यामुळे काही तणांचे बी परत उगविले. या काळात मी त्यांच्या बागेला तीन वेळा भेट दिली होती. बागेत सर्वत्र वेगवेगळी परिस्थिती दिसत होती. अशा तणवाढीमुळे द्राक्ष वेल आणि पर्यायाने शेतकऱ्याचे अनेक फायदे होतात.
बागेत आंतरमशागत बंद झाल्याने त्याचा खर्च वाचला. एप्रिल-मेमध्ये काडी तयार झाल्यानंतर त्याचा शेंडा मारला जातो. उद्देश हा असतो, की काडीतील अन्नद्रव्ये पुढील वाढीसाठी वापरली जाऊ नयेत. तरीही काडीला पुढच्या बाजूस फुटवे येत राहतात आणि ते माणसे लावून सतत काढून टाकण्याचे काम चालू असते. हंगामात असा खुडा काढण्याच्या कामासाठी एकूण ५० ते ६० मजूर लागतात.
खुडा काढण्याचे काम संपूर्ण पावसाळाभर चालू असते. या काळात बाग स्वच्छ ठेवल्यास वेलाला अतिरिक्त अन्नपुरवठा होतो. यामुळे खुडा येण्याचे प्रमाण वाढते. या काळात जर बागेत तणे वाढत असतील तर वेलाला संतुलित अन्नपुरवठा होतो. अतिरिक्त अन्नपुरवठा तणे फस्त करतात, यामुळे खुडा खूपच कमी प्रमाणात येतो. या कामावरील खर्चात बचत होते.
अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर तणे वाढवून मारली तर पुढे ती कुजून त्याचे सेंद्रिय खत बागेला मिळते. यामुळे बाहेरून कोणतेही सेंद्रिय खत आणून टाकण्याची गरज राहत नाही. बहुतेक बागायतदार माल उत्तम प्रतीचा मिळवण्यासाठी २५ ते ५०,००० रुपयांचे शेणखत बागेत मिसळतात. परंतु बागेमध्ये जागेलाच तयार केलेल्या खतामुळे शेणखत खरेदी, भरणी, उतरणी, वाहतूक, बागेत नेऊन विस्कटणे आणि मातीत मिसळणे ही कामे आपोआप संपून जातात.
दोन्ही छाटण्यांचे अवशेष आणि तणे यातून सेंद्रिय खताची गरज भागते. कुजणारा पदार्थ बागेबाहेर न कुजविता थेट बागेत कुजत राहिल्याने जमिनीचे शुद्धीकरण होते. यामुळे मालाचा दर्जा अत्युच्च मिळतो. याच्या फायद्याविषयी लिहिण्याची गरज नाही. संतुलित अन्नद्रव्यांमुळे कीडनाशक, बुरशीनाशकाच्या फवारण्या खूप कमी होतात.
बागेत सेंद्रिय पदार्थ भरपूर झाल्याने रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते, वापर कमी करता येतो, पाणी अतिशय कमी लागते. फळधारणेनंतर वापरली जाणारी संजीवके सदर शेतकरी कमी प्रमाणात वापरतो. यामुळे द्राक्षाची फुगवण मर्यादित प्रमाणात होते.
द्राक्ष शेतीमध्ये भरपूर खर्च करणे व विक्रमी उत्पादन घेणे (४० आरसाठी १८ ते २० टन) आणि मर्यादित खर्च करून १२ ते १५ टनांपर्यंत उत्पादन घेणे; परंतु दर्जा उत्तम राखणे असे दोन विचारप्रवाह आहेत. भरपूर खर्च करून एखादे संकट येऊन उत्पादन कमी मिळाले तर शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. कमी खर्च करणारा नुकसानीला तोंड देऊ शकतो. या शेतकऱ्याचा दर्जा उत्तम मिळाल्याने गावात
व्यापारी आल्यानंतर प्रथम या बागेतील माल इतरांपेक्षा जास्त दर देऊन खरेदी करतो, तर इतरांना येण्याचे वायदे देत फिरतो. मागील वर्षी सततच्या पावसाने द्राक्षाचे नुकसान झाले; परंतु उत्पादन खर्च निघाला. आज ऊसवाले यापेक्षा जास्त खर्च सांगतात. द्राक्ष बाग इतक्या कमी खर्चात होऊ शकेल यावर बहुतेकांचा विश्वास बसणार नाही. ही जास्ती करून तण व्यवस्थापनाची किमया आहे.
पर्ण देठातील नत्र मोजण्याची द्राक्ष क्षेत्रात प्रथा आहे. रोग, किडीला यामुळेच प्रामुख्याने वाढायला वाव मिळतो. तण हे काम बरोबर करतात. बागेचे पोषण तणाबरोबर संघर्ष करून, झगडून झाले पाहिजे तरच वेलाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आज आपण एका बाजूला रोग प्रादुर्भावाला अनुकूल अवस्था निर्माण करतो. रोग येऊ नये म्हणून सतत बुरशीनाशकाच्या फवारण्या करतो. द्राक्ष बागायतदार आज मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आहेत असे वाचनात येते. यातून काही शिकावे का?
सीताफळ, मोसंबी, पपई बागांतील प्रयोग ः
१) सीताफळाच्या बागेत काही शेतकऱ्यांनी प्रयोग करून चांगले उत्पादन मिळविले आहे. काही शेतकऱ्यांनी कळविले आहे, की यंदा जास्त पाऊस असूनही बोंडसड दोन ओळींत तण वाढविल्यामुळे झाली नाही.
२) संत्रा व मोसंबी बागेत फळगळ मोठ्या प्रमाणावर झाल्याच्या बातम्या आहेत. तण व्यवस्थापनामुळे अशी फळगळ झाली नाही अगर नगण्य झाल्याचे काही शेतकऱ्यांनी कळविले आहे.
३) एका शेतकऱ्याने पपई बाग संपल्यावर पीक अवशेष तेथेच पाडून टाकले. पुढे पावसाळ्यात तेथेच तणे वाढविली आणि ती तणे मारून पुढे भाजीपाला, वेलवर्गीय भाजीपाला आणि खरबुजाचे विक्रमी पीक घेतले. करून घेतले तर तण व्यवस्थापनाचे फायदेच फायदे आहेत. दुर्लक्ष केल्यास ते नुकसानीला कारणीभूतही ठरू शकते.
४) कोकणातील आंबा बागेत पावसाळा चालू होण्यापूर्वी फळकाढणीचे काम संपते. पावसाळ्यात बागेत काहीही काम नसते. पाऊस भरपूर असल्यामुळे तण माजते. पुढे ते काही ठिकाणी उपटून काढले जाते. त्याऐवजी शिफारशीत तणनाशकाने मारावे. फवारणी करणाऱ्याने गमबूट वापरावेत. तणांची मुळे खोलवर गेलेली असतात ती तशीच ठेवण्यात बागेचा फायदा आहे.
ज्यांना तणनाशक वापरावयाचे नाही त्यांनी ब्रश कटरने तणे जागेलाच कापून टाकावीत. अशा वेळी काही तणे मरतील. गवतवर्गीय तणे परत फुटून जोमाने वाढतील. तणे मरणे आणि कुजून त्यापासून सेंद्रिय कर्ब फुकटात मिळविण्याचे काम यातून साध्य होत नाही. जवळ अंतरावरील पिकात तण वाढविता येत नाही. यासाठी खरीप व रब्बी हंगामाच्या मधल्या ३०-४० दिवसांत तणे वाढवून मारावीत.
(लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.