
डॉ. मदन पेंडके, डॉ. वासुदेव नारखेडे, आम्रपाली गुंजकर
पीक व्यवस्थापन प्रकारात समतल मशागत, पेरणी, आंतरपीक पद्धती आणि जैविक बांधाचा समावेश होतो. तर जमिनीच्या मशागत पद्धतीत मृतसरी, ठरावीक ओळीनंतर जलसंधारण सरी, सरी-वरंबा, बंदिस्त सरी, रुंद वरंबा सरी पद्धत व बंदिस्त बांध यांचा समावेश होतो.
मूलस्थानी जलसंधारण पद्धतीः समतल मशागत व पेरणी
- पेरणी क्षेत्राच्या समतल रेषेला जमिनीची नांगरणी, वखरणी, पेरणी व आंतरमशागत ही कामे समांतर केली जातात. या सर्व पद्धती आंतरबांध क्षेत्रात बांधबंधिस्तीच्या जोडीने बांधाला समांतर राबविण्यात येतात.
- या पद्धतीद्वारे कमी उताराच्या जमिनीत (१ टक्क्यापेक्षा कमी) मृद् व जलसंधारण शक्य होते.
- या पद्धतीसाठी मशागतीपूर्वी जमिनीच्या उतारानुसार दुर्बीण, प्लॅस्टिक पारदर्शक नळी किंवा हायड्रोमार्करच्या साह्याने एक किंवा अधिक समतल मार्गदर्शक रेषा आखून घ्याव्यात.
फायदेः
- पिकाच्या दोन ओळींत पडलेले पावसाचे पाणी तेथेच मुरण्यास पुरेसा कालावधी मिळतो.
- पावसाचे पाणी जमिनीमध्ये एकसारख्या प्रमाणात मुरते. त्यामुळे पिकांना एकसमान प्रमाणात पाणी उपलब्ध होते.
- समतल मार्गदर्शक रेषेविना केवळ उताराला आडवी मशागत व पेरणी केल्यामुळे जलसंधारणात वृद्धी होऊन उत्पादनात वाढ होते.
आंतरपीक पद्धतीः
- मृद् व जलसंधारणाच्या दृष्टीने आंतरपीक पद्धती फायदेशीर ठरते.
- या पद्धतीत डाळवर्गीय पिकांची मुख्य पिकांत लागवड केली जाते. त्यामुळे जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्यास अटकाव केला जाऊन जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते.
- या पद्धतीसाठी जलसंधारणाच्या दृष्टीने, शिफारस केलेल्या आंतरपीक पद्धतीची निवड करून योग्य अंतरावर पिकाची लागवड करावी.
जैविक बांधः
- कमी उताराच्या जमिनीवर मृद् व जलसंधारणाकरिता मातीच्या बांधाच्या ऐवजी जैविक बांध उपयुक्त ठरतात. तर मध्यम उतारावरील जमिनीकरिता मातीच्या बांधाच्या जोडीने जैविक बांधाचा उपयोग परिणामकारक ठरतो.
- जैविक बांध घालण्यासाठी खसगवत, सुबाभूळ, गिरिपुष्प, झुडूपवर्गीय वनस्पती किंवा चराऊ गवताचा वापर केला जातो. या वनस्पतींचा वापर करून उताराला आडवा किंवा समतल रेषेवर २५ ते ३० मीटर अंतरावर बांध घालावा.
- सुबाभूळ, गिरिपुष्पाच्या छाटलेल्या कोवळ्या फांद्या व पाने यांचा सेंद्रिय खत आणि आच्छादनाकरिता तर चराऊ गवताचा चारा म्हणून उपयोग होतो.
- सुबाभूळचा ज्वारीवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे ज्वारीवर आधारित पीक पद्धती असलेल्या क्षेत्राकरिता जैविक बांधासाठी सुबाभूळचा वापर करू नये.
- जैविक बांधाचा समतल मशागतीकरिता मार्गदर्शक रेषा म्हणूनही उपयोग होतो.
उभ्या पिकात सऱ्या काढणेः
- कमी उताराच्या जमिनीवर सुरुवातीची आंतर मशागतीची कामे संपल्यानंतर (पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी) बळिराम नांगराच्या साह्याने किंवा कोळप्याच्या फणाला दोर बांधून काही ओळींनंतर सऱ्या काढल्या जातात.
- या सऱ्या सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संधारण करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
- या सऱ्यांमुळे जमिनीमध्ये पाणी मुरण्याचे प्रमाण वाढून ते दीर्घकाळ टिकून राहते. त्याचा दीर्घ कालावधीच्या पिकांच्या वाढीकरिता चांगला उपयोग होतो.
- कापूस, तूर यासारख्या जास्त अंतरावर घेतल्या जाणाऱ्या पिकांत प्रत्येक दोन ओळींनंतर, तर ओळीने पेरलेल्या कमी अंतराच्या पिकांत (उदा. ज्वारी, बाजरी, मका, मूग, उडीद, सोयाबीन इ.) प्रत्येक ४ ते ६ ओळींनंतर सऱ्या काढाव्यात. यामुळे हवा व पाणी यांचे योग्य संतुलन राखले जाते. त्यामुळे उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते.
सरी वरंबा व बंदिस्त सरीः
- हलक्या तसेच मध्यम उताराच्या जमिनीवर पिकांच्या मूलस्थानी पावसाचे पाणी मुरविण्याकरीता सरी वरंबा पद्धत फायदेशीर ठरते.
- पेरणीपूर्वी सरी वंरबे तयार करून वरंब्यावर पेरणी करावी. सऱ्यांमध्ये पावसाचे पाणी जमा होऊन ते वरंब्यात तसेच जमिनीत मुरते. अतिरिक्त पाणी सऱ्यांद्वारे शेताबाहेर वाहून जाते.
- या पद्धतीमुळे वरंब्यात हवा व पाणी यांचे योग्य संतुलन राखले जाते.
- ही पद्धत ज्वारी, बाजरी, सूर्यफूल, कापूस इत्यादी पिकासाठी फायदेशीर आहे.
- कमी पावसाच्या क्षेत्राकरिता तसेच अनियमित उताराच्या जमिनीत सलग सरी न ठेवता ठराविक अंतरावर (५ ते ६ मी) सरीमध्ये आडवे वरंबे तयार केले जातात. त्यास ‘बंदिस्त सरी’ पद्धत असे म्हणतात. ही पद्धत पिकांच्या मूलस्थानी पाणी मुरविण्याकरिता सर्वांत उपयुक्त व कार्यक्षम आहे.
रुंद वरंबा-सरी पद्धतः
- भारी जमिनीमध्ये जलसंधारण तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी ही पद्धती फायदेशीर आहे.
- यामध्ये रिजरच्या साहाय्याने रुंद वंरबे-सऱ्या तयार केल्या जातात. पिकांतील ओळींच्या गरजेप्रमाणे वरंब्याची रुंदी ठरवून वरंब्याच्या दोन्ही बाजूला सऱ्या पाडल्या जातात. या रुंद वरंब्यावर पेरणी केली जाते.
- साधारणपणे जास्त अंतरावरील पिकांच्या (कापूस, तूर) दोन ओळी तर कमी अंतरावरील पिकांच्या (सोयाबीन, हरभरा) ३ ते ४ ओळी वरंब्यावर येतात. याप्रमाणे नियोजन करून सऱ्या पाडल्या जातात.
- रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन होते. सरीतील पाणी वरंब्यामध्ये मुरते तर अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढले जाते.
- वरंब्यामध्ये हवा व पाणी यांचे योग्य संतुलन राखले जाऊन उत्पादनात वाढ होते.
- जास्त पावसाच्या क्षेत्रात सऱ्यांना ०.१ ते ०.३ टक्का उतार दिला जातो.
- रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये पेरणीसाठी बीबीएफ पेरणी यंत्राचा वापर करावा.
डॉ. मदन पेंडके, ९८९०४३३८०३
(अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन केंद्र,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.