Soil And Water Conservation : शिवारातील पाणी शेतातच अडवून जिरविण्याचे उपाय
Water Conservation : शेतातील पाणी आणि माती आपल्याच शेतातच राहावी यासाठी पाऊस सुरु होण्यापुर्वी आपल्या शेतात मृद जलसंधारणाचे उपाय करावे लागतात.
बागायती क्षेत्र निकृष्ट होण्याची क्रिया कमी करण्यासाठी किंवा पूर्णपणे थांबविण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीनं मृद व जलसंधारणाच्या उपाययोजना कराव्या लागतात. प्रत्येक गाव शिवारातील पाणी त्या शिवारातच कसे अडवून जिरविलं जाईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी प्रत्येक शेतशिवारात पाणलोट क्षेत्र विकास महत्त्वाचा आहे. याद्वारे पावसाच्या पाण्याचं पद्धतशीरपणे संवर्धन होतं.
नाला बंडिंग
नाल्यात मातीचे नाला बांध बांधल्यास पावसाचे वाहणारे पाणी दीर्घकाळ साठवून राहाते.
नाल्यामध्ये साठलेले पाणी जमिनीत कालांतराने मुरत जाते. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते.
वळवणीचा बंधारा
नाल्याच्या प्रवाहामधून उजव्या आणि डाव्या बाजूने पाणी वळविण्याची सोय असल्यास वाहणारे पाणी शेतातून फिरत येते. यातूनच हे पाणी जमिनीत झिरपून पाणी अडविणे, जिरविणे हे साध्य होते.
बंधाराच्या पाणलोट क्षेत्रात मृद व जलसंधारणाची कामे केल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरते. हे मुरलेले पाणी झऱ्याच्या स्वरूपात नदी किंवा विहिरीत पुन्हा येते.
गाव तळे
गावाच्या आसपास खोलगट जमिनीत जेथे पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या वाहत येते तेथे मातीचा बंधारा तयार करून गावतळे तयार होते. गावतळ्यात पाण्याचा साठा जास्तीत जास्त कसा करता येईल याकरिता स्थानिक पातळीवर नियोजन करावे.
दर तीन वर्षांनी गावतळ्यातील गाळ काढावा. जेणेकरून पाणीसाठा कमी होणार नाही. गावतळ्यात साठलेले पाणी दीर्घकाळ साठून जमिनीत झिरपते. त्यामुळे खालील बाजूस असणाऱ्या विहिरीमधील पाण्याच्या पातळीत चांगली वाढ होते.
दगडी बंधारा
काही गावातील पाणलोट क्षेत्रातून वाहणारे नाले अरुंद असतात. दोन्ही तिरांवर खडक आढळतो. अशा ठिकाणी दगडी बंधाऱ्याचा उपयोग पावसाचे पाणी अडविणे, साठविणे आणि जमिनीत झिरविणे यासाठी करावा. दगडी बंधाऱ्याची उंची, उतार, तळातील रुंदी यातील गोष्टी बंधाऱ्याच्या जागेवर अवलंबून असतात. बंधाऱ्यात पाणीसाठा जास्त झाल्यास अधिक येणारे पाणी बंधाऱ्यातून वाहून जाते. यामुळे बंधारा बांधताना हे पाणी बाजूच्या शेतजमिनीतून जाऊ नये याप्रमाणे बांधकाम करावे.
रिचार्ज पीट
ज्या भागात विहीर नसेल तेथे रिचार्ज पीट तयार करून छतावरील किंवा इतर ठिकाणचे पाणी जमिनीत मुरविता येते.
हे पीट २.५ ते ३ मीटर खोल तसेच १.५ ते ३ मीटर लांबी रुंदीचे असावेत. यात मोठे दगड, छोटे दगट तसेच वाळू/रेतीचा चाळा भरावा आणि त्याचा पृष्ठभाग कुठल्याही जाळीने झाकावा जेणे करुन पाण्यासोबत येणारा कचरा यात जाणार नाही.
शोष खड्डा
सांडपाणी किंवा पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी शोष खड्ड्याचा वापर करावा. शोष खड्डा तयार करताना १.५ ते २ मीटर लांबी, रुंदी तसेच २ ते २.५ मीटर खोल खड्डा तयार करून त्यात दगड विटा भरून तयार करावा.
पुनर्भरण चर
पाणलोट क्षेत्रातील गावात पावसाचे पाणी अडवून जमिनीमध्ये पाणी पुनर्भरणाची प्रक्रिया वेगाने व्हावी हे उद्दिष्ट समोर ठेवून आज जमिनीत पाण्याचे पुनर्भरण यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पुनर्भरण चर हे पाणलोटात एक महत्त्वाचे कार्य आहे. पुनर्भरण चरामुळे पाण्याचे स्त्रोत कायम होण्यासाठी मदत होते. पाणी जमिनीच्या आत साठवून राहिल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.