
वैभव गिरी, डॉ. विलास तांबे
सामान्यपणे वर्षभरासाठी लागणारे धान्य जसे, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी इत्यादींची साठवणूक करून ठेवली जाते. कोणत्याही धान्याचा साठा करून ठेवताना योग्य काळजी घेणे आवश्यक असते. अनेक वेळा वातावरणातील बदलामुळे किंवा साठवणुकीत योग्य काळजी न घेतल्यामुळे कीड किंवा बुरशी लागून धान्य खराब होते. धान्यामध्ये ८ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो. कीड आणि बुरशी लागलेले धान्य खाण्यायोग्य राहत नाही. तसेच दाण्यांचे वजन कमी झाल्यामुळे योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यासाठी धान्य साठविताना योग्य ती काळजी घेऊन वेळीच उपाययोजना केल्यास संभाव्य नुकसान टाळता येते.
धान्य साठवणुकीवेळी किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी धान्य साठविताना घरगुती स्तरावर विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे फायद्याचे ठरते.
प्रतिबंधात्मक उपाय ः
- धान्य मळणीसाठी शक्यतो लोकवस्ती आणि धान्य साठवणुकीच्या जागेपासून दूर अशी जागा निवडावी. तसेच निवडलेली जागा स्वच्छ आणि किडीपासून मुक्त असावी.
- मळणी केल्यानंतर धान्य उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यावे. धान्यातील ओलाव्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी असावे. ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्यास धान्याला कीड लागण्याची शक्यता असते.
- धान्याची पोती जमिनीवर रचून ठेवू नयेत. जमिनीवर साठविल्यामुळे धान्य जमिनीतील उपलब्ध ओलावा शोषून घेते. परिणामी, धान्य चांगले वाळविलेले असून देखील त्यातील ओलाव्याचे प्रमाण वाढते.
- धान्य साठवणीपूर्वी त्यातील किडलेले, खराब दाणे चाळून आणि उधळणीद्वारे वेगळे करावेत.
- धान्य साठवणुकीसाठी आधुनिक हवाबंद कोठ्या वापराव्यात. जेणेकरून धान्याला कीड लागली तरी हवेचा पुरवठा न झाल्यामुळे कीड आपोआपच मारली जाईल.
- साठवणुकीसाठी वापरलेल्या पारंपरिक कोठार किंवा कणगीला असलेली छिद्रे चुन्याने बुजवून घ्यावीत.
- धान्य साठवणुकीची जागा आणि आजूबाजूचा परिसर झाडून, धुऊन स्वच्छ करावा. सर्व काडीकचरा जाळून नष्ट करावा.
- साठवणुकीच्या खोलीमध्ये उंदरांनी पाडलेली बिळे काचेचा चुरा भरून नंतर सिमेंटने बंद करावा. जेणेकरून उंदरांना पुन्हा सहजरीत्या बिळे पाडता येणार नाहीत.
- धान्य साठवणुकीच्या जागी पावसाळ्यात पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी.
- धान्य साठवणुकीसाठी शक्यतो लोखंडी किंवा धातूपासून बनविलेल्या पत्र्याच्या कोठ्या वापराव्यात.
- धान्य साठवणीच्या कोठ्या किंवा पोती स्वच्छ धुऊन काही वेळ उन्हात ठेवाव्यात. दरवर्षी वापरल्या जाणाऱ्या पोत्यांमध्ये कीटक व त्यांची अंडी तशीच राहून प्रादुर्भाव वाढू शकतो. पोषक वातावरण तयार होताच कीडमुक्त धान्याला देखील पुन्हा कीड लागण्याची शक्यता असते.
- साठवणीच्या गोण्या किंवा पोती गरम पाण्यात ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमानाला १० ते १५ मिनिटे भिजवून नंतर वाळवावीत. आणि नंतर त्यात धान्य भरावे.
- धान्य भिंतीपासून ३ फूट उंचीवर साठवावे. कारण पावसाळ्यात भिंतीतील ओलावा धान्य शोषून घेते. परिणामी, धान्यातील ओलाव्याचे प्रमाण वाढून ते खराब होते.
घरगुती उपाययोजना ः
१) कडुलिंबाची पाने ः
धान्याला लागणारी कीड बहुगुणी कडुलिंबाच्या पानांचा वापर करून रोखता येते. यासाठी कडुलिंबाची पाने सावलीमध्ये वाळवून घ्यावीत. वाळलेली पाने प्लॅस्टिक किंवा कापडाच्या पिशवीत भरावीत. तत्पूर्वी पिशवीला लहान छिद्रे पाडावीत किंवा कापडात बांधावीत. ही पिशवी धान्याच्या गोण्यांमध्ये वेगवेगळ्या थरांमध्ये किंवा साठवणुकीच्या डब्यामध्ये ठेवावीत. कडुनिंब पानांच्या तीव्र वासामुळे धान्याला कीड लागत नाही.
२) लसूण ः
धान्याला लागणारी कीड रोखण्यासाठी लसूण प्रभावी काम करते. त्यासाठी साल न काढलेली लसणाची संपूर्ण गड्डी वापरावी. प्रथम डब्यात धान्य टाकून त्यावर लसणाची एक गड्डी आणि त्यावर पुन्हा धान्य असे साधारण थर ठेवावेत. तसेच डब्याचे झाकणही बंद राहील याची काळजी घ्यावी.
३) लाल मिरच्या ः
धान्यातील कीड आणि अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाल मिरचीचा वापर फायदेशीर ठरतो. त्यासाठी धान्य भरताना प्रत्येक थराला ४ ते ५ लाल सुकलेल्या मिरच्या ठेवाव्यात.
४) लवंग ः
या पद्धतीमध्ये कडुलिंबाची वाळवलेली पाने आणि लसूण समप्रमाणात घेऊन त्यात १० ते १५ लवंगा टाकाव्यात. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी टाकून कडुनिंब पाने, लसूण आणि लवंग चांगले बारीक करून घ्यावे. तयार मिश्रणाच्या मध्यम आकाराच्या गोळ्या बनवून २ ते ३ दिवस उन्हामध्ये सुकवाव्यात. या गोळ्या कापडामध्ये बांधून धान्यांच्या थरांत ठेवाव्यात. त्यामुळे कीड आणि अळींचा प्रादुर्भाव कमी होतो.
५) कडुलिंबाच्या बिया ः
कडुलिंबाच्या बियांची पावडर ही धान्य साठवणुकीसाठी अत्यंत प्रभावीपणे काम असते. कडुलिंबाच्या बियांची पावडर धान्यात मिसळल्यास किडीपासून संरक्षण होते.
६) पुदिना पानांची भुकटी किंवा राख ः
पुदिना पानांची भुकटी किंवा राख धान्यात मिसळल्यास किडींच्या श्वसनामध्ये अडथळा येऊन कीड मरते.
७) मीठ किंवा कांदे ः
बऱ्याच वेळा साठवलेल्या धान्यामध्ये भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणासाठी साठवणुकीवेळी धान्यात मीठ मिसळावे किंवा कांदे ठेवावेत. कांद्याच्या उग्र वासामुळे धान्याला भुंगेरे लागत नाहीत. तसेच मीठ धान्यातील अतिरिक्त पाणी शोषून घेते. त्यामुळे जिवाणूंची वाढ होत नाही.
८) गोडेतेल ः
धान्य साठवणुकीवेळी एरंडी, भुईमूग, खोबरेल किंवा मोहरी तेल वापरल्यास किडींचा प्रादुर्भाव रोखता येतो. तेलामुळे किडींची अंडी उबण्यास प्रतिबंध होऊन उत्पत्ती थांबते. त्यासाठी १ चमचा तेल प्रति किलो धान्य याप्रमाणे चोळावे. १ क्विंटल धान्यासाठी अर्धा ते एक किलो तेल वापरावे.
वैभव गिरी, ९१४६४१२२१० (सहायक प्राध्यापक, कृषी कीटकशास्त्र विभाग, रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय पिंपरी-वर्धा)
डॉ. विलास तांबे, ९५२७७६३८५७ (प्रमुख, कृषी कीटकशास्त्र विभाग) कृषी महाविद्यालय, नागपूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.