सीताफळ बागेतील बहराचे नियोजन

कमी पाण्यावर येणारे, काटक, हलक्या व मुरमाड जमिनीत चांगल्या प्रकारे वाढणारे सीताफळ हे पीक शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरत आहे.
Custard Apple
Custard AppleAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्रदीप दळवे, डॉ. युवराज बालगुडे

सीताफळाचे अधिक उत्पादनासाठी (Custard Apple Production) बहराचे योग्य व्यवस्थापन आवश्यक असते. जून महिन्यात नैसर्गिक बहार येतो. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडीमुळे झाडांची पानगळ (Defoliation) होऊन झाडे सुप्तावस्थेत जातात. वसंत ऋतू सुरू झाल्यावर नवीन फूट येऊन फुले येतात. मात्र उन्हाळ्यात जास्त तापमान व कोरड्या हवेमुळे फुले गळून पडतात. अपेक्षित फळधारणा होत नाही. पावसाळा सुरू झाल्यावर पुन्हा फुले येतात. या काळात कमी तापमान व ८० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता असल्यामुळे चांगली फळधारणा होऊन अधिक उत्पादन मिळते. या बहरातील फळे सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान काढणीस येतात. या काळात उबदार व कोरडे हवामान असल्याने फळांना चांगली गोडी येते.

बहर व्यवस्थापनात खालील बाबींचा समावेश होतो.

झाडांची छाटणी करणे

मागील हंगामातील फळांची काढणी झाल्यानंतर पाण्याचा ताण व हिवाळ्यातील कमी तापमानामुळे सीताफळ झाडांची पानगळ होऊन झाडे सुप्तावस्थेत जातात. अपेक्षित फळधारणा व फळांची गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने झाडाच्या फांद्यांची हलकी छाटणी करणे आवश्यक असते.

-बहर धरताना मे महिन्याच्या अखेरीस ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हलकी छाटणी करावी. छाटणीमध्ये जुन्या वाळलेल्या फांद्या, अनावश्‍यक व दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात. झाडाचा मध्यभाग मोकळा राहील, अशा पद्धतीने छाटणी करावी. त्यामुळे पूर्ण झाडास भरपूर सूर्यप्रकाश मिळेल. झाडाची उत्पादकता ही झाडास मिळणारा सूर्यप्रकाश आणि त्याचे झाडामध्ये पसरण्याशी संबंधित असते. छाटणीमुळे वाढ नियंत्रित ठेवल्याने झाडावर मर्यादित फळे राहतात. फळे आकाराने मोठी होतात. त्यांची गुणवत्ता वाढते.

-झाडाची खोडे जमिनीपासून २ ते २.५ फुटापर्यंत मोकळी करावीत. खोडावर १० टक्के तीव्रतेची बोर्डो पेस्ट लावावी. (प्रमाण ः एक किलो चुना अधिक एक किलो मोरचूद अधिक १० लिटर पाणी)

-झाडांवर नवीन फूट फुटण्यापूर्वी झाडांच्या फांद्या आणि खोडावर १ टक्का बोर्डो मिश्रणाची (१०० ग्रॅम चुना अधिक १०० ग्रॅम मोरचूद प्रति १० लिटर पाणी) फवारणी करावी.

बहर धरण्यापूर्वी बागेस ताण देणे

-एप्रिल-मे महिन्यातील वाढत्या तापमानामुळे झाडाची नैसर्गिक पानगळ होते. झाडे सुप्तावस्थेत जातात. चांगला ताण बसण्यासाठी झाडांची ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पानगळ होणे आवश्‍यक असते.

ताण देण्याचा काळ संपल्यावर बहर धरण्यापूर्वी बागेची स्वच्छता करावी. त्यासाठी बागेत पडलेली काळी पाने, रोगट फळे, झाडावर लटकलेली काळी व रोगग्रस्त फळे गोळा करून नष्ट करावीत.

पाणी व्यवस्थापन

-बागेत तणांचा प्रादुर्भाव कमी करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर व पाण्याची बचत करण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. यासाठी प्लॅस्टिक आच्छादन अथवा पालापाचोळा, उसाचे पाचट, वाळलेले गवत, लाकडाचा भुस्सा इ. चा वापर करावा.

-नैसर्गिक बहरात निव्वळ पावसाच्या पाण्यावरसुद्धा चांगले उत्पादन मिळते. मात्र, पावसाचा खंड पडल्यास, जमिनीच्या मगदुरानुसार भारी जमिनीत ५-६ व हलक्या जमिनीत ३-४ दिवसांनी संरक्षित पाणी द्यावे.

-फळवाढीच्या काळात पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.

-पाणी देण्याकरिता ठिबक सिंचनपद्धतीचा अवलंब केल्यास ५०-७० टक्के पाण्याची बचत होते. तणांचाही प्रादुर्भाव कमी होतो.

खत व्यवस्थापन

पूर्ण वाढ झालेल्या झाडांना प्रतिझाड ५० किलो शेणखत व २५० ग्रॅम नत्र, १२५ ग्रॅम स्फुरद व १२५ ग्रॅम पालाश अशी खतमात्रा द्यावी. नत्राची निम्मी मात्रा तसेच स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा पहिले पाणी देताना द्यावी. नत्राची उर्वरित मात्रा त्यानंतर ३० दिवसांच्या अंतराने द्यावी.

डॉ. प्रदीप दळवे (उद्यान विद्यावेत्ता), ८९८३३१०१८५ (अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळ पिके (अंजीर आणि सीताफळ) संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com