सरकारने आरोग्यवर्धक तृणधान्यांना (भरडधान्यांना) "श्रीअन्न" म्हणून ओळख दिली आहे. त्यामुळे प्रत्येकाने "श्रीअन्नाचे" ब्रँड अँम्बेसिडर व्हावे. त्याच्या आहारातील सेवनातून आपले आरोग्य ही चांगले राहील आणि देशातील छोट्या शेतकऱ्यांचे कल्याण होईल असे मत पंतप्रधानांनी अलिकडेच एका कार्यक्रमात व्यक्त केले आहे. मुळात शेतकऱ्यांनी श्रीअन्नाकडे (भरडधान्याकडे) दुर्लक्ष का केले आहे. याचे कारण या श्रीअन्नाच्या रास्त भावाचा प्रश्न आहे. हे विसरून श्रीअन्न हा बँड तयार करता येणार नाही.
श्रीअन्नातील ज्वारीचे उदाहरण घ्या. शेतकऱ्यांना काय भावाने विकली जाते आणि ग्राहकांना काय भाव मिळते याचा विचार केला आहे का? दोन-चार दिवसांपूर्वी परभणीच्या बाजारात ज्वारी 2500 ते 2700 रुपये क्विंटल होती. तर तीच ज्वारी शहरी ग्राहकांना 5200 ते 5700 रुपयांने शहरी ग्राहकांना घ्यावी लागत होती. जवळजवळ दुप्पट, म्हणजे 2700 ते 3000 रुपयांचा फरक येतो. हा फरक का? यापुढे तर उद्योगांने ज्वारीच्या आटयाचे ब्रँड बनवून विकले तर 80 ते 120 रुपये किलो ने विकले जाते. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भाव आणि ग्राहकांना घ्यावे लागणारे भाव यामध्ये जवळपास 55 ते 93 रुपयांचा फरक होतो. अशीच अवस्था (कहाणी) इतरही भरडधान्यांची (श्रीअन्नाची) आहे.
ज्वारीला 3225 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र शेतकऱ्यांना मार्केटमध्ये हमीभावापेक्षा कमी भावाने विकावी लागत आहे. हमीभाव मिळावा यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. त्याचा फायदा व्यापारी उद्योजक हे घेत आहेत. दुसरे, ज्वारीच्या काढणीला 8 ते 9 हजार रुपये मजुरी खर्च येतो असे अनेक शेतकऱ्यांनी मिडियाकडे बोलून दाखवले आहे. घरचे दोन मजूर वगळून प्रती एकर एकूण उत्पादन खर्च 20 ते 25 हजार रुपये येतो. एकरी 8 क्विंटल सरासरी उत्पादन पकडले तरीही 2500 रुपयांनी 20 हजारांचे उत्पादन मिळते. अर्थात खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी मिळते. त्यामुळे शेतकरी इतर पर्याय पिकांकडे (नगदी-व्यापारी पिकांकडे) वळत आहेत. यात शेतकऱ्यांची काय चूक नाही. तर धोरणे तसे तयार केले आहेत. भरडधान्य पिकांच्या बाजूने एकही धोरण अनुकूल नाही.
एकंदर भरडधान्यांना " श्रीअन्नाला" असे आकर्षक-गोंडस नाव द्यायचे. मात्र उत्पादक घटकांना त्याचा फायदा झाला नाही पाहिजे हे धोरण चालू ठेवायचे. अर्थात श्रीअन्नाचे उत्पादन शेतकऱ्यांनी करायचे. मात्र यावरील नफा व्यापाऱ्यांनी , उद्योजकांनी कमवून पोळी भाजून घ्यायची. शेतकऱ्यांना हमीभाव देखील मिळत नसेल तर "शेतकऱ्यांचे कल्याण " कसे होणार हे समजले नाही. भरडधान्य पिकांना हमीभाव असो किंवा रास्त भावाचा प्रश्न न सोडवता "श्रीअन्नाचा" हा ब्रँड कसा यशस्वी होईल? हा प्रश्न आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.