Fertilizer price : रासायनिक खतांचा वापर का वाढतोय?
डॉ. सोमिनाथ घोळवे
Chemical fertilizers Update : रासायनिक खतांचा वापर खूपच मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. या वाढत्या रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे शेती, जंगल, पाणी आणि मानव दुष्परिणाम होत आहेत. या संदर्भातील पुरेसा अभ्यास पुढे आलेला नाही... किंवा त्याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात नाही.
1960 च्या दशकात अमेरिकेत वाढत्या रासायनिक खतांच्या वापराची दखल घेतली गेली. रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्या फेरविचार करण्याचे निर्देश नॅशनल रिसोर्सस काऊन्सिलला तत्कालीन राष्ट्राध्यक्षणांनी दिले होते.
यावर सखोल सर्वेक्षण, संशोधन आणि चिंतन करून रासायनिक, औद्योगिक शेती, उत्पादन पद्धतील आळा घालून "कमीत कमी बाह्य आदनाच्या आधारे शाश्वत शेतीची शिफारस केली.
आज आपल्याकडे काय दिसते?.रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर किती वाढवला आहे?. दिवसेंदिवस रासायनिक खते आणि कीटकनाशके वापराची आकडेवारी वाढत जाणारी आहे.
त्यात अलीकडे विविध टॉनिक वापरण्याची शिफारस करणाऱ्या कंपन्यांनी धुमाकूळ घातला आहे. आपले शेतीशास्त्रज्ञ, नियोजनकार आणि धोरणकर्ते हे कोणत्याही मार्गाने उत्पादन वाढीच्या मागे लागले आहेत. शेती-माती, पर्यावरण, मानव , जनावरे याचे काहीच देणेघेणे राहिले नाही.
पहिल्या हरितक्रांतीचे उत्पादन वाढले पण शेतीची विनाश आणि वाटोळे किती केले याचे मूल्यमापन अजूनही केले नाही. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या हरितक्रांतीचे स्वप्न आपण बघत आहेत. कृषी क्षेत्रातील विकासाची दिशा कशाप्रकारे ठरवत आहोत याचे आत्मचिंतन करणे गरजेचे झाले आहे.
दुसऱ्या बाजूने पाहिले तर शेतमाल वाढून अन्नधान्यात देश स्वयंपूर्ण बनणे हा पहिल्या हरित क्रांतीचे यश आहे, ते नाकारता येत नाही. पण हरितक्रांती झाल्यानंतर हळूहळू जे परिणाम पुढे येत आहेत, त्यावर सखोल अभ्यास आणि उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.
त्यामुळे आपल्याला उत्पन्न वाढ दिसत असली, तरी मातीच्या सुपिकतेमध्ये घसरण होत चालली आहे, त्याचे अभ्यास करून घसरण थांबवण्यासाठी जे प्रयत्न होईल हवे होते ते होताना दिसून येत नाहीत.
रासायनिक खतांच्या वापरला विरोध करता येत नाही. पण रासायनिक खते मातीचे परीक्षण करूनच ते वापरावेत. जेणेकरून मातीमधील सुपीकता कमी होणार नाही की उत्पादनात घसरण होणार नाही, ही काळजी घेणे गरजेचे आहे. या संदर्भात शासकीय पातळीवर पुढाकार घेणे गरजेचे आहे. इतर संस्था किंवा शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यायचे म्हटले तर पुरेशी जागृती आणि संसाधनांचा आभाव आहे.
रासायनिक खतांच्या बाबतीत खते वापराचे तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक आहे. शिवाय खते वापरण्यांच्या पद्धती आणि व्यवस्थापन विकसित करणे गरजेचे आहे. कोणते पीक आणि किती मात्रांमध्ये कोणते खत वापरायचे ह्याची साक्षरता शेतकऱ्यांमध्ये असायला हवी आहे.
आपल्याकडे बहुतांश शेतकरी हे आणले खताचे पोते की विस्कटून टाकले असे चालू आहे, हे करून चालणार नाही. आपल्याकडे खते वापरण्याची साक्षरता आणि व्यवस्थापन पुरेश आले नाही. कोणत्या पिकांना कोणते खत द्यावे ह्याविषयी पुरेषे साक्षरता नाही.
2022 च्या खरीप हंगामात मी माझ्या गावातील (मुंडेवाडी ता. केज जि. बीड) सोयाबीनच्या पिकाला युरियाचे तीन -तीन डोस देताना शेतकरी पाहिले आहेत. हे डोस का? तर सोयाबीनची वाढ चांगली आणि हिरवीगार होण्यासाठी.
अलीकडे कृषी विभागाने रायायनिक खतांचा साठा मुकबल उपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा तुटवडा नसणार आहे. तरीही शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला माती तपासणी अहवालाप्रमाणे खताची मात्रा दिली पाहिजे.
प्रमाणापेक्षा अधिक खत दिले तर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पिकांना भासून उत्पादन घटते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांसोबत कुजलेले शेणखत, कंपोस्ट, जैविक खत (बायोफर्टिलायझर्स), नॅनो यूरिया यांचाही वापर आवश्यकतेप्रमाणे करणे आवश्यक आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.