Onion Market : शेती प्रश्नांवरही धार्मिक ध्रुवीकरणाचा मोदींचा डाव !

शेवटी मात्र १० वर्षात कांदा उत्पादक कसे सुखी केले, याची शेखी मिरवली. पण कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतरही कांदा उत्पादकांच्या झालेल्या कोंडीबद्दल शब्दही काढला नाही.
Onion Rate
Onion RateAgrowon

देशाचे पंतप्रधान बुधवारी पिंपळगाव बसवंतला आले होते. दिंडोरीच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार आणि नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मोदींनी सभा घेतली. याच सभेत एक तरुण उठला आणि मोदींनी कांदा प्रश्नावर बोलावं यासाठी घोषणाबाजी करू लागला. त्यामुळं सभेत एकच गोंधळ उडाला. त्यानंतर सभेत बसलेल्या जनतेमधून मोदींनी कांदा प्रश्नावर बोलण्याची मागणी केली गेली. तोवर मोदींनी त्यावर जय श्रीरामच्या घोषणा देत कांदा प्रश्नाला दाबवण्यासाठी जय श्रीरामच्या घोषणा दिली. आणि वेळ मारून नेली. 

केंद्र सरकारने सहा महीने कांदा निर्यातबंदी करून कांदा उत्पादकांच्या ताटात माती कालवली. कांदा निर्यातबंदीचं प्रकरण निवडणुकांच्या मैदानात अंगलट येते की काय अशी शक्यता दिसताच निर्यातबंदी उठवून किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्काचा खुटा मारून दिला. तर दुसरीकडे कांदा उत्पादकांची नाराजी दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी नाशिक जिल्ह्यात हजेरी लावली.

किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क

या सभेत कांदा प्रश्नावर मोदींनी बोलावं यासाठी शेतकरी, शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी भूमिका घेत जोर लावला. पण पोलिस बळाच्या जोरावर शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करण्यात आली. शेवटी याच सभेत किशोर सानप या तरूणानं घोषणाबाजी करत कांदा प्रश्नावर बोलण्याची मागणी केली. कारण कांदा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. कांदा निर्यातीवर ५५० डॉलर किमान निर्यात मूल्य आणि ४० टक्के निर्यात शुल्क लावलेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यावर मोदींनी बोलावं अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. पण मोदींनी त्यावरही जय श्रीरामची घोषणा करून शेतकऱ्यांची मागणी उडवून लावली. 

Onion Rate
Onion Rate : मोदींना कांदा प्रश्नांवर बोलेन; छगन भुजबळ यांचं कांदा उत्पादकांना आश्वासन!

राजकरण तापलं

कांदा प्रश्नाचा आणि जय श्रीरामच्या घोषणेचा काडीचाही संबंध नसतानाही मोदींनी मात्र जाणीवपूर्वक घोषणा दिली. या घोषणांच्या आडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल दिली गेली. यावरून राजकारण तापल्यावर भारती पवारांनी सावरासावर करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. घोषणा देणारा तरुण किशोर सानप हा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्या असल्याचं सांगत स्टंट करून विरोधकांनी मुद्दाम वातावरण तापवल्याचं जाहीर करून टाकलं. भारती पवारांच्या या विधानाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, या भागात शेतकरी जागरूक आहेत, यापूर्वी तर सभेत कांदे फेकल्याचे प्रकार घडल्याचेही पत्रकार परिषदेत पवार म्हणाले. कांदा फेकल्याचे पवारांनी सांगितले त्याचे कारण म्हणजे २००६ साली शरद पवारांवर नाशिकमध्ये कांदा उत्पादकांनी कांदे भिरकवले होते. 

शरद पवारांवर कांदे भिरकवले

नाशिक जिल्ह्यात २००६ साली कांदा प्रश्नावरुन भडका उडलेला. त्यावेळी केंद्रात पवार होते कृषीमंत्री. त्यावर्षी कांद्याचे दर पडले होते. याच दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या देवळा इथं डाळिंब परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेला पवारही उपस्थित होते. पवाराच्या भाषणानंतर सभा संपणार होती. पवारांचं भाषण सुरू झालं. आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्यावर बोला म्हणत घोषणाबाजी केली. एवढंच नाही तर पवारांच्या अंगावर एक दोन कांदेही भिरकवले. पण त्यानंतरही पवारांनी कांदा प्रश्नावर संसदेत ठाम भूमिका घेतली होती. ग्राहकांना परवडत नसेल कांदा खाऊ नका, असंही सुनावलं होतं. आणि कांदा निर्यातबंदी करणार नाही, असं संसदेत सांगून टाकलं होतं. त्यामुळं मोदींच्या सभेत कांद्यावर बोला ही शेतकऱ्यांची मागणी म्हणजे कसलाही द्रोह नव्हता. पण त्याकडेही मोदींनी दुर्लक्ष केलं. 

शेती प्रश्नांवर धार्मिक ध्रुवीकरण ?

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका महायुतीला बसू शकतो, याची जाणीव होताच राष्ट्रवादी कॉँग्रेसचं नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही उघड भूमिका घेतली. मोदींना पत्र लिहून कांदा निर्यात धोरणामुळं निर्माण झालेली शेतकऱ्यांची नाराजी मोदींच्या कानावर घातली. कांदा प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. पण मोदींनी भाषणाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शब्दही काढला नाही. मग मध्येच किशोर सानप या तरूणांनं घोषणाबाजी केली. त्यावेळी प्रत्युत्तर म्हणून जय श्रीरामची घोषणा दिली.

शेवटी मात्र १० वर्षात कांदा उत्पादक कसे सुखी केले, याची शेखी मिरवली. पण कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतरही कांदा उत्पादकांच्या झालेल्या कोंडीबद्दल शब्दही काढला नाही. कांदा निर्यातबंदी उठवूनही कांद्याचा प्रश्न सुटलेला नाही. शेतकऱ्यांनी त्यावर बोलण्याची मागणी केल्यावर मूळ मुद्द्याला बगल देत धार्मिक ध्रुवीकरण करण्यावर मोदींनी भर दिला. त्यामुळे पंतप्रधानांना कांदा प्रश्न सोडवण्यात काडीचाही रस नाही, एवढं तर स्पष्ट होतं.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com