Alibaug News : पावसाळा सुरू होण्यास अजून दोन महिने उरले असताना रायगड जिल्ह्यात पाणीटंचाई सुरू झाली आहे. टँकरने येत असलेले पाणी मिळवण्यासाठी महिलांना कसरत करावी लागत आहे. भरउन्हात लहान मुलांना सोबत घेऊन लांबून पाणी आणावे लागत आहे.
पाण्यासाठी अनेकांचा वेळ वाया जात असून याचा दैनंदिन कामावरही परिणाम होत आहे. जिल्ह्यात २६ हजारांहून अधिक नागरिकांना पाण्याच्या टंचाईची झळ बसत असून १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पेण, कर्जत, अलिबाग व पनवेल तालुक्यांचा सर्वाधिक झळ बसत आहे.
खारेपाट विभागात केंद्र शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या जलजीवन योजनांचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने ही टंचाई जाणवत आहे. त्याचबरोबर येथे जीवन प्राधिकरणाचीही योजना आठ वर्षांपासून रखडली आहे.
यामुळे पेण तालुक्यातील तुकारामवाडी, मसद बु., मसद बेडे, बोर्वे, निफाडवाडी, खरबाची वाडी, शिर्की या गावांमधील महिलांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे.
अलिबाग तालुक्यातील हाशिवरे, सारळ, रेवस या गावांमध्येही पाणीटंचाई सुरू झाली आहे; परंतु तेथे अद्याप टॅंकर सुरू करण्यात आलेले नाहीत. ही पाणीटंचाई टप्प्याटप्प्याने अधिक गंभीर होत चालली आहे.
रायगड जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे साडेपाचशे गावे आणि एक हजार गावांना दरवर्षी टंचाई जाणवत असते. रायगड जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या एक हजार ४४४ योजनांमुळे ही पाणीटंचाई कमी होईल,
असा अंदाज पाणीपुरवठा विभागाचा आहे. यासाठी तब्बल दीड हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत; मात्र त्याचा काहीही परिणाम दिसून येत नसल्याने दरवर्षीच्या कालावधीत पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
जिल्ह्यात सर्वप्रथम पेण तालुक्यात पाणीटंचाई सुरू होते. ही टंचाई दूर करण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. पेणसह पनवेल, खालापूर तालुक्यातही पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
२५ हजार नागरिकांना झळ
रायगड जिल्ह्यात १५ गावे, ५५ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. यातील २४ हजार ९५३ नागरिकांना पाणीटंचाई जाणवत आहे.
यातील अलिबाग तालुक्यातील ५ हजार ४३९, पनवेल तालुक्यातील १२ हजार ८८४, कर्जत १ हजार ८७८, पेणमध्ये ४ हजार ७५२ नागरिकांचा समावेश आहे. यासाठी १९ टॅंकर सुरू केले आहेत.
जलजीवन योजना अर्धवट
शहापाडा धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी शिर्की चाळ- १, शिर्किचाळ - २, निफाड ठाकूरवाडी, खरबाची वाडी, कांडणे आदिवासीवाडी, जानवली बेडी, खबसावाडी, आंबिवली, निगडे आदिवासी वाडी,
शेडाची ठाकूरवाडी या गावांना स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनेंतर्गत १ कोटी ३६ लाखांची योजना जलजीवनमधून सुरू करण्यात येत आहे. या योजनेचे काम अद्याप पूर्ण होऊ शकले नाही.
पाणी मुबलक; तरीही टंचाई
भरपूर पाण्याची उपलब्धता असतानाही नियोजनाच्या दुष्काळामुळे पेण तालुका पाण्याअभावी होरपळत असल्याचे चित्र आहे. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे हेटवणे धरण याच तालुक्यात आहे. तसेच आकाराने छोटे असलेल्या आंबेगाव धरणातील मुबलक पाणीसाठा वापर न होताच पडून आहे.
दुसरीकडे खारेपाट विभागातील शिर्की, वाशी येथील जनतेला पाणीपुरवठा होत असलेल्या शहापाडा धरणातही साठा आहे. मुबलक पाणी असूनही योग्य नियोजन नसल्याने खारेपाट विभागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
रेवस तहानलेलाच
जिल्ह्यात जलजीवन, ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असूनही योग्य नियोजन होत नसल्याने पाणीटंचाईची समस्या आहे. अलिबाग तालुक्यातही रेवस विभाग हा नेहमीच तहानलेला राहिलेला आहे. जानेवारीपासूनच या विभागात पाणीटंचाई भेडसावते.
२०२४ चा आराखडा
संभाव्य टंचाईग्रस्त गावे २१५
संभाव्य टंचाईग्रस्त वाड्या ५५०
आराखड्यातील कामे अंदाजे खर्च
सार्वजनिक विहिरी खोल करणे १.४ कोटी
टॅंकर/बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा १.४४ कोटी
नवीन विंधणविहिरी खोदणे १.४ कोटी
विंधणविहिरींची दुरुस्ती ५८ लाख
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.