
Alibag News : अलिबाग : रायगडमधील पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होऊ लागल्या आहेत. जिल्ह्यातील २० गावे आणि १०३ वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. यासाठी २४ टॅंकर कामाला लावण्यात आले आहेत. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने यजमानांसह पै-पाहुण्यांना या पाणीटंचाईचा सामना सर्वाधिक करावा लागत आहे.
यंदा उन्हाची तीव्रता जास्त जाणवत असल्याने पाण्याचे बाष्पीभवनही जास्त होत आहेत. त्यामुळे येथील पाणवटे, विहिरींनी तळ गाठला आहे. तलावांमध्ये शेवटचा चिखल उरला आहे, धरणे आटू लागली आहेत, भूगर्भातील पाणीपातळी खूपच खालावली असल्याने बोअरवेलमधून पाणी येणे बंद झाले आहे. टॅंकरवाल्यांकडे विकण्यासाठीही पाणी शिल्लक राहिले नसल्याने ॲडव्हान्स पैसे देऊनही येथील नागरिकांना पाणी मिळत नाही, अशी भयानक परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
राज्य सरकारकडून २० वाड्या-वस्त्यांमधील ६५ हजार ६३१ नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या सरकारी आकडेवारीपेक्षा जिल्ह्यातील पाणीटंचाईची दाहकता भीषण आहे. जिल्ह्यातील एकाही नगरपालिका हद्दीत पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. शहरांपासून वाड्या-वस्त्यांपर्यंतचे नागरिक पाण्यासाठी व्याकूळ झाले आहेत.
जलजीवन योजनांसाठी रायगड जिल्ह्यात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले; पण येथील पाणीटंचाईत काहीही फरक पडलेला नाही. मागील पाच वर्षांतील ही भीषण टंचाई आहे, असे येथील लोकांचे म्हणणे आहे.
२४ लघुपाटबंधाऱ्यांनी तळ गाठला
वाढत्या तापमानामुळे धरणांमधील पाण्याची पातळीदेखील दिवसेंदिवस कमी होत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या २८ धरणांपैकी जिल्ह्यातील फक्त चारच धरणांमध्ये मॉन्सून येईपर्यंत पाणीसाठा आहे; मात्र उर्वरित २४ धरणांनी तळ गाठला आहे. त्यामध्ये १२ धरणांमध्ये फक्त आठ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक राहिले असल्याची माहिती समोर आली आहे.
यावर्षी उन्हाचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झालेले आहे. त्याचबरोबर एमआयडीसीकडून होणाऱ्या पाइपलाइनची डागडुजी सुरू आहे. गाळाने साचलेल्या विहिरी, तलावांची स्वच्छता सुरू आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे प्रमाण थोडे जास्त जाणवत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या वतीने नागरिकांची पाण्याची समस्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग
सर्वाधिक टंचाई पेण तालुक्यात
सर्वाधिक पाणीटंचाई पेण तालुक्याला दरवर्षी भासत असते. खारेपाट विभागात जलजीवन योजनांचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने ही टंचाई जाणवत आहे. त्याचबरोबर येथे जीवन प्राधिकरणाचीही योजना आठ वर्षांपासून रखडली आहे. यामुळे पेण तालुक्यातील तुकारावाडी, मसद बु., मसद बेडे, बोर्वे, निफाडवाडी, खरबाचीवाडी, शिर्की या गावांमधील महिलांची पाण्यासाठी पायपीट सुरू झालेली आहे. अलिबाग तालुक्यातील हाशिवरे, सारळ, रेवस या गावांमध्येही पाणीटंचाई सुरू झाली आहे. पेण तालुक्यात पनवेलनंतर सर्वाधिक १० सरकारी टॅंकर सुरू आहेत; तर खासगी टॅंकरमालकांचे सुगीचे दिवस आले आहेत.
२४ लघुपाटबंधाऱ्यांनी तळ गाठला
वाढत्या तापमानामुळे धरणांमधील पाण्याची पातळीदेखील दिवसेंदिवस कमी होत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या २८ धरणांपैकी जिल्ह्यातील फक्त चारच धरणांमध्ये मॉन्सून येईपर्यंत पाणीसाठा आहे; मात्र उर्वरित २४ धरणांनी तळ गाठला आहे. त्यामध्ये १२ धरणांमध्ये फक्त आठ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक राहिले असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्याची पाणीटंचाईग्रस्त गावे
तालुका गावे वाड्या लोकसंख्या
अलिबाग ३ ० ६,४७९
पेण ८ ६३ ३६,७३८
पनवेल ५ १४ १६,४७८
महाड ४ २६ ५,९३६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.