Pune News : गेल्या वर्षी राज्यात सरासरी पेक्षा पाऊस कमी झाल्याने यंदा राज्यावर पाणीटंचाईचे सावट घोंगावत आहे. यादरम्यान राज्यातील सर्व धरणातील पाणीसाठा ३७.०७ टक्क्यांवर आल्याने राज्यातील दुष्काळाचे संकट अधिक गडद झाले आहे. यादरम्यान पुण्याच्या शेजारी असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील खंडोबाच्या जेजुरीत पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून टँकरने पाणी पुरवठा करा अन्यथा लोकसभा निवडणुकीत बहिष्कार टाकणार पवित्र जेजुरीकरांनी घेतला आहे. तसेच विद्युत बिल थकल्यामुळे गोंदियातील ४८ गावांना पाणी पुरवणाऱ्या योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे येथे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे.
यंदा राज्यात पाणी टंचाईचे संकट राज्यावर घोंगावत अशून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीबाणी सुरू झाली आहे. राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा हा ४० टक्क्यापेक्षा कमी झाल्याने अनेक गावात सध्या पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. राज्यातील सर्व धरणातील पाणीसाठा रविवारी (ता. ३१ मार्च) ३७.९१ टक्के होता. तर सोमवारी (ता.०१) यात ०.८४ टक्क्यांची घट झाली आहे. सध्या राज्यातील सर्व धरणातील पाणीसाठा हा ३७.०७ टक्के आहे.
यादरम्यान देवाची जेजुरीत मात्र पाण्यावरून नागरीकांनी संपात व्यक्त केला आहे. जेजूरी शहरासह शेजारील गावांमध्ये पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. तर टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा अशी मागणी नगरपरिषद प्रशासनाला करण्यात आली आहे. तसेच याबाबत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना जेजुरीकारांनी पत्र दिले असून पिण्याच्या पाण्याचे नियोजन न झाल्यास लोकसभा निवडणुकीत बहिष्कार टाकू असा इशारा देण्यात आला आहे.
तर पुरंदर तालुक्यात असणारे नाझरे धरण कोरडे पडल्याने बारामती तालुक्यासह पुरंदर तालुक्याला पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे. तर धरणात पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्याच्या तीन नळ प्रादेशिक योजना बंद पडल्या आहेत. यामुळे येथील २२ गावांना सुरू असणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा १९ मार्चपासून पूर्णपणे थांबविण्यात आला आहे. पण पर्यायी सुविधा सुरू प्रशासनाने न केल्याने नागरिकांमधून तीव्र संतापाचा उद्रेक होत आहे.
गोंदियात ४८ गावांची वणवण
दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील ४८ गावांची वणवण पाण्यासाठी होत असून येथे शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करणारी योजना पाच दिवसापासून बंद पडली आहे. या योजनेचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केल्याने गेल्या पाच दिवसापासून ४८ गावांतील पाणी पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे भर उन्हाळ्यात शुद्ध पिण्याचे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.
तर भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती केल्याने आरोग्यावर परिणाम होण्याची संभावना असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. तर लवकरात लवकर प्रशासनाने वीज बिलावर तोडगा काढवा. तसेच शुद्ध पिण्याचे पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.