
Jalgaon News : खानदेशात उष्णता कायम आहे. उन्हाळ पिकांसह केळी, भाजीपाला, पपई आदी पिकांसाठी पाण्याचा वापर वाढला आहे. पुढे कापूस लागवडही सुरू होईल. यातच खानदेशातील प्रकल्पांमधील एकूण जलसाठा २८ टक्क्यांखाली आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील गिरणा, वाघूर, हतनूर या प्रकल्पांतील जलसाठाही ३० टक्क्यांवर आहे. गिरणा नदीवरील चाळीसगावनजीकच्या गिरणा धरणात यंदा १०० टक्के जलसाठा होता. परंतु पाण्याचा वापर वाढला आहे. धरणातून नदीत दोन वेळेस आवर्तन सोडण्यात आले आहे. तसेच सुमारे २१ हजार हेक्टवरील क्षेत्रातील रब्बीसही गिरणातून यंदा पाणी देण्यात आले. मागील महिन्यातच गिरणातील जलसाठा ३२ टक्क्यांपर्यंत होता. त्यात उष्णता व अन्य कारणांनी सतत घट झाली आहे.
गिरणा धरणातून नदीत तिसरे आवर्तन सोडण्यात आलेले नाही. एप्रिलमध्ये तिसऱ्या आवर्तनाची अपेक्षा होती. परंतु तिसरे आवर्तन सोडण्यात आले नाही. आता या महिन्यात नदीत तातडीने आवर्तन सोडले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे गिरणातील जलसाठा पुढे आणखी कमी होईल. यात पाऊस लांबल्यास गिरणातील जलसाठा फक्त पिण्याच्या पाण्यासाठी राखीव केला जाईल, असेही संकेत आहेत.
तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणातूनही रब्बीसाठी तीन वेळेस पाणी देण्यात आले आहे. तसेच भुसावळ शहर, भुसावळ तालुक्यातील आयुध निर्माणी, औष्णिक विद्युत प्रकल्प, जळगावातील औद्योगिक वसाहतीसही या धरणातून पाणी दिले जात आहे. यामुळे यातील जलसाठाही ३० टक्क्यांपर्यंत आहे. हतनूरची साठवण क्षमता सुमारे नऊ टीएमसी आहे.
वाघूर धरण जामनेरात असून, त्यातून जळगाव शहर, जामनेर शहर व लहान-मोठ्या गावांसह, एक उद्योग, रब्बीसाठी पाणी देण्यात आले. उन्हाळ हंगामासाठीदेखील त्यातून पाणी दिले जात आहे. वाघूरचा लाभ भुसावळ, जळगावातील रब्बीस झाला आहे. त्यातून तीन वेळेस रब्बीला पाणी देण्यात आले. वाघूरची साठवण क्षमता नऊ टीएमसी आहे. त्यातील जलसाठाही चिंताजनक स्थितीत आहे.
यासह जळगाव जिल्ह्यातील रावेरमधील मंगरूळ, अभोडा, यावलमधील सुकी, मोर, मनुदेवी, चोपड्यातील गूळ, जामनेरमधील तोंडापूर, एरंडोलातील अंजनी, पाचोऱ्यातील बहुळा, अग्नावती, चाळीसगावमधील मन्याड, धुळे जिल्ह्यातील अमरावती, मालनगाव, जामखेली, पांझरा, सोनवद, बुराई, अनेर, नंदुरबारमधील दरा, देहली, चिरडे, सुसरी या प्रकल्पांतील जलसाठाही घटला आहे.
जळगावमधील १२० गावांच्या पाणी योजना अवलंबून
गिरणा धरणावर जळगाव जिल्ह्यातील १२० गावांच्या पाणी योजनांसह नाशिकमधील मनमाड, जळगावातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या शहरांचा पाणीपुरवठादेखील अवलंबून आहे. गिरणा धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. हा सर्वांत मोठा प्रकल्प असून, त्याचा लाभ गिरणा पट्ट्यास होतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.