Akola News : वसमत (जि. हिंगोली) बाजार समितीत हळद विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची ५० टक्के रक्कम थकल्याने त्या शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. २७) आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
वाशीम जिल्ह्यातील जगदीश राजे (रा. अनसिंग), विशाल चोपडे (खडी), वालचंद बारड (येडशी), विठ्ठल दहातोंडे (आमगव्हाण) यांनी १३ ते २४ जुलै या काळात वसमत येथे बालाजी कदम यांच्या जगदंब ट्रेडिंग कंपनीमार्फत हळद विकली आहे.
तेव्हा शेतकऱ्यांना बाजार समितीच्या काटा पावतीसह मालाच्या चुकाऱ्याचे १५ ते २० दिवसांनंतरच्या तारखेचे धनादेश दिले आहेत. यानुसार शेतकऱ्यांनी संबंधित धनादेश बँक खात्यात भरले असता ते वटले नाहीत. यानंतर चुकाऱ्यासाठी सातत्याने कंपनीशी संपर्क केला, परंतु संबंधितांचा मोबाइल बंद येत होता.
दरम्यान या शेतकऱ्यांनी वसमत बाजार समिती सभापती, सचिव तसेच जिल्हा उपनिबंधकांना याबाबत लेखी निवेदन दिले. बाजार समितीसमोर उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर बाजार समितीतर्फे प्रयत्न करून ४ नोव्हेंबरला विक्री केलेल्या मालाची ५० टक्के रक्कम मिळवून देण्यात आली.
उर्वरित ५० टक्के रक्कम अद्याप मिळालेली नाही. ही रक्कम तत्काळ मिळवून द्यावी, अशी मागणी करीत बुधवारी (ता. २७) सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी निवेदनात दिला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. २२) हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे तहसील कार्यालय, पोलीस, सहायक निबंधकांना निवेदन दिले आहे.
शेतकऱ्यांची नावे विक्री केलेला माल (क्विंटल) एकूण रक्कम (रुपयांत)
जगदीश राजे ४२.०६ ३५५५०५
विशाल चोपडे ४५.५७ ४००८२९
बालचंद बारड २७.७८ ३१२५७०
विठ्ठल दहातोंडे ४८.८९ ७१७९०१
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.