
Wardha News : शहरातील महात्मा फुले मुख्य भाजी बाजाराचे अत्याधुनिकीकरण करण्यासह अनेक सुविधा उपलब्ध करणारा प्रस्ताव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दोन वर्षांपूर्वी शासनाला सादर करण्यात आला. तब्बल ८० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेला हा प्रस्ताव शासन दरबारी धूळखात आहे.
वर्ध्यातील मुख्य भाजी बाजाराला विविध समस्यांनी ग्रासले आहे. मोक्याच्या ठिकाणी हा भाजी बाजार असून, पूर्वी येथे घाऊक भाजी बाजारदेखील सुरू राहायचा. मात्र कोविड काळात घाऊक भाजी बाजाराचे व्यवहार धान्य बाजारपेठ परिसरात नेण्यात आले.
मुख्य भाजी बाजार विविध दृष्टींनी सोयींचा आहे. येथून रेल्वे स्थानक, बस स्थानक हाकेच्या अंतरावर आहे. मुख्य बाजारपेठही लागूनच आहे. दळणवळण आणि सुविधांच्या दृष्टीने सोयीचा असलेल्या मुख्य भाजी बाजाराचा परिसरात सुमारे सव्वातीन एकरात पसरलेला आहे.
या परिसरात जुनीच दुकाने आहेत. तसेच या बाजाराच्या परिसरात कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे येथे मोठी दुर्गंधी असते. बाजार परिसरात पावसाळ्यात तर अधिकच बिकट परिस्थिती असते. आवागमन करताना येथे अडचणींचा सामना करावा लागतो. वाहनतळ किंवा इतर व्यवस्थाही योग्य पद्धतीच्या नाहीत. त्यामुळे भाजी बाजाराचे नव्याने निर्माण करण्याची मागणी वेळोवेळी होते.
बाजार समितीच्या वतीने अडीच वर्षांपूर्वी पणन व सहकारला याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला. सुमारे ८० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला हा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात येते. पण दोन वर्षांपासून हा प्रस्ताव धूळ खात आहे. प्रस्ताव दुर्लक्षित असल्याने पुढील प्रक्रियाही सुरू झालेल्या नाहीत.
बीओटी तत्त्वावर हा प्रस्ताव सादर करण्यात आला. विस्तीर्ण जागेत भाजी बाजाराचे आधुनिकीकरण करण्यास तळमजला अधिक दोन अशी संरचना यात प्रस्तावित आहे. यामध्ये मागील बाजूस पार्किंग, कार्यालय, सभागृह, हॉल, तसेच गाळे सुविधा करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
तसेच कचऱ्यापासून खत आणि गॅस निर्मितीचा प्रस्ताव आहे. अद्ययावत भाजी बाजारात ग्रेडिंग, पॅकिंग सेंटर, कोल्ड स्टोअरेज अशा सुविधा शेतकऱ्यांसाठीही उपलब्ध करण्याचा बाजार समितीचा मानस असल्याचे सांगण्यात आले.
नव्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा
गेल्या अडीच वर्षांपासून भाजी बाजार अत्याधुनिकीकरणाचा प्रस्ताव प्रलंबित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातीलच आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले आहेत. वर्ध्यातील हा महत्त्वपूर्ण विषय मार्गी लागेल काय, असा प्रश्न वर्धेकरांकडून उपस्थित केला जात आहे.
भाजी बाजाराचे आधुनिकीकरण करण्यासह बांधकामाचा प्रस्ताव पणन व सहकार विभागाला दोन वर्षांपूर्वी सादर करण्यात आला. हा प्रस्ताव मार्गी लागावा, याकरिता प्रयत्नशील आहे. मंजुरी मिळाल्यास अद्ययावत भाजी बाजार सुरू होईल. -अमित गावंडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.