
अभिजित डाके/राजकुमार चौगुले
Kolhapur/Sangli : मॉन्सूनपूर्व पावसाने दडी मारल्याने याचा नकारात्मक परिणाम ऊस लागवडीवर झाला आहे. यामुळे रोपांची मागणी ही थंडावली आहे. ऊस लागवड न झाल्यास यंदा दक्षिण महाराष्ट्रात ऊस क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.
दक्षिण महाराष्ट्रात आडसाली ऊस लागवड सर्वसाधारण मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सुरू होते. त्यानुसार शेतकरी पूर्व मशागत करून लागवड करण्यासाठी सरी सोडून ठेवतात.
उन्हाळी पाऊस झाल्यानंतर शेतकरी ऊस लागवड करण्याचे नियोजन करत असतो. कृष्णा आणि वारणा नदी काठ आणि विहिरी आणि कूपनलिकांमधील उपलब्ध पाण्यावर ऊस लागवडीचे धाडस शेतकरी करतो. गेल्या पाच वर्षांपासून उन्हाळी पाऊस वेळेत पडत होता.
त्यामुळे शेतकरी रोहिणी नक्षत्र सुरू होण्यापूर्वी ऊस लागवड करायचा. त्यानंतर मॉन्सूनचा पाऊस वेळेत पडत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत होता.
यंदा शेतकऱ्यांनी ऊस लागवड करण्यासाठी पूर्व मशागत करून सरी सोडल्या आहेत. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात यंदा उन्हाळी पाऊस अपेक्षित झाला नाही. त्यातच वाढत्या तापमानामुळे विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्या भागात पाणी आहे, त्या ठिकाणी वीज खंडित होत आहे.
कमी दाबाने वीजपुरवठ्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी मोटार आणि डीपी जळण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे उभा ऊस वाळू लागला आहे. पावसाचे रोहिणी नक्षत्र कोरडे गेले आहे.
येत्या दोन दिवसांत मृग नक्षत्र सुरू होईल. पण अजून पावसाचा पत्ता नाही. तापमान अजून कमी नाही. लागवड करून अडचणी येणार असल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवड करण्याचे धाडस केले नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.