Pune News : राजेगाव, खानवटे, मलठण, वाटलूज, नायगाव आणि स्वामी-चिंचोली (ता. दौंड) परिसरामध्ये सर्वजण जोरदार मॉन्सूनच्या पावसाची प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. पावसाच्या आगमनापूर्वी शेतातील सर्व कामे उरकण्यात बळिराजा व्यग्र असून खरीपपूर्व हंगामाने गती घेतल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वळवाच्या रूपात वरुणराजाने हजेरी लावली. मात्र, मुसळधार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. पूर्व भागात गेल्या दोन महिन्यापासून वातावरणात प्रचंड उष्णता वाढली असून यंदा तापमानाने चाळीशी पार केलेली आहे.
यातच आभाळ येत असल्याने उष्णतेची तीव्रता अधिकच वाढत चालली आहे. यामुळे कधी एकदा वरुण राजा बरसात करतोय याचीच प्रतीक्षा शेतकरी वर्गाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही आहे.
दौंड तालुक्यातील पूर्व भागातील नदीकाठच्या गावांमध्ये आडसाली उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर आणि कूपनलिका यांचे पाणी उपलब्ध आहे त्यांनी धोरणबाह्य आडसाली लागवडीला सुरुवात केली आहे.
आडसाली ऊस लागवडीबरोबरच या भागात खरीप हंगामात बाजरी, मका, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस ही पिकेही मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. सध्या खरिपातील पिके घेण्यासाठी पेरणीपूर्व मशागतीला वेग आला असून पेरणीसाठी पेरणीयोग्य शेत तयार करण्यात येत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.