
Pune News: राज्याच्या ऊसशेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा विस्तार होण्यासाठी स्वतंत्र कृतिगटाची स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) नियामक मंडळाने घेतला आहे.
‘व्हीएसआय’चे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.२१) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘व्हीएसआय’चे विश्वस्त व उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, बी. बी. ठोंबरे, हर्षवर्धन पाटील, सल्लागार शिवाजीराव देशमुख, महासंचालक संभाजी कडू पाटील तसेच ‘सकाळ माध्यम’ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्यासह इतर विश्वस्त या वेळी उपस्थित होते.
बारामती येथे अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राकडून घेतलेल्या प्रयोगाची माहिती या वेळी देण्यात आली. केंद्राकडून एक हजारांहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान नेले आहे. मात्र, आता राज्यभर या तंत्राचा विस्तार व्हावा व त्यासाठी बारामती केव्हीके, ‘व्हीएसआय’ यांच्यासह साखर संघ, विस्मा अशा साखर उद्योगाच्या संबंधित संस्थांच्या कृतिगटाने पुढील दिशा निश्चित करावी, असे बैठकीत निश्चित केले गेले.
कृतिगटाची जबाबादारी जयंत पाटलांकडे
कृतिगटाचे प्रमुख म्हणून जयंत पाटील यांच्याकडे; तर समन्वयक म्हणून शिवाजीराव देशमुख यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कृतिगटाची बैठक होत असून त्यानंतर ऊसशेतीमधील विस्ताराची दिशा अधिक स्पष्ट होणार आहे. कृतिगटामध्ये जयप्रकाश दांडेगावकर, बी. बी. ठोंबरे, विशाल पाटील, इंद्रजित मोहिते, विश्वजीत कदम यांचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे प्रतापराव पवार यांचा समावेश कृतिगटात असून एआय तंत्र राज्यभर नेमक्या कशा पद्धतीने न्यावे व त्यात साखर कारखान्यांची भूमिका निश्चितपणे कशी असावी, याविषयी निर्णय घेण्याची जबाबदारी व्हीएसआयने या कृतिगटावर सोपवली आहे.
एआय तंत्राचा वापर करावाच लागेल : उपमुख्यमंत्री
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, व्हीएसआयच्या नियामक मंडळाच्या बैठकीत आम्ही ऊस शेतीत एआय तंत्राचा अवलंब करण्याबाबत चर्चा केली. यावेळी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीने काही मुद्दे मांडले. या तंत्राचा वापर साखर उद्योगाला करावाच लागेल, हे मी यापूर्वीच सांगितले होते. आजच्या बैठकीत या तंत्राचा प्रसार राज्यभर कसा करता येईल. कोणत्या वाणांची निवड करावी लागेल, निविष्ठा व पाण्याची बचत कशी करता येईल. त्यातून उसाची उत्पादकता कशी वाढवता येईल, याविषयी चर्चा झाली.
अन्य पिकांमध्येही एआयचा वापर
“राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एआयबाबत उसावर घेतलेल्या बारामतीमधील प्रयोग यशस्वी झाले आहे. या प्रयोगांचा विस्तार राज्याच्या इतर भागातील ऊस शेतीत करण्याचा हेतू आमचा असला तरी उसाबरोबरच या तंत्राचा वापर सोयाबीन, कपाशीसह अन्य पिकांमध्येही होण्याची भूमिका सरकारची आहे," असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी स्पष्ट केले.
कै. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या नावाने पुरस्कार
राज्याच्या साखर उद्योगात तांत्रिक गटात उत्कृष्ट काम करणाऱ्या साखर कारखान्यास कै. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा विषय व्हीएसआयच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. गुजरातच्या नर्मदा खांड उद्योग सहकारी मंडळाचे सभासदत्व रद्द करणे, व्हीएसआयच्या विविध बांधकामांची प्रगती, खरेदी समितीने घेतलेले निर्णय, जालना येथील जमीन खरेदी व स्थायी सेवकांना महागाई भत्ता देण्याच्या विषयांवर यावेळी चर्चा झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.