
‘महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात वेगवेगळ्या देवी-देवतांच्या, सत्पुरुषांच्या नावाने दरवर्षी जत्रा या भरत असतात. राज्यातील धार्मिक, सांस्कृतिक, लोककला, लोकपरंपरांचा एक महत्त्वाचा भाग म्हणूनही या जत्रांकडे आपल्याला पाहता येईल. गावातील असणाऱ्या ग्रामदेवता, लोकदेवता यांची सामूहिक रीतीने कृतज्ञता या जत्रांमधून व्यक्त केली जाते.
समाजातील विविध समुदाय आणि व्यक्तींना त्यांची ‘स्व’ची समज, दृष्टी आणि सामाजिक पार्श्वभूमीची देवाण-घेवाण विधीद्वारे नोंदवण्याची जत्रा ही एक जागा किंवा स्थान असते.’ सोन्थायमर गुंथर या जर्मन अभ्यासकाने महाराष्ट्रातील गावोगावी भरणाऱ्या जत्रांबद्दल मांडलेली ही वरील मत किती उद्बोधक आहे! या अशा कोणातून आपण जत्रेकडे कधी पाहिलंय का? पूर्वी या गावाकडल्या जत्रा जलसे, जनावरांचे बाजार, शर्यती, लोकनाट्य तसेच तमाशे यांनी भरलेले असायचे. आज या जत्रांचं अप्रूप आपल्याला फारसं राहिलं नाही.
कारण करमणुकीची वाढलेली साधने, थिएटरमध्ये पाहायला सहज उपलब्ध असणारे सिनेमे, मोबाईलवर सहज उपलब्ध असलेले ॲमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्ससारखे ओटीटी प्लॅटफॉर्म यामुळे आपली करमणूक पाहिजे तेव्हा, पाहिजे तिथे, पाहिजे तशी सहज हातात आली. करमणुकीसाठी आपलं इतरांवर अवलंबून राहणं बंद झालं. तोच प्रकार जत्रांमधून मिळणाऱ्या आनंदावर विरजण पडण्यावर झाला.
पूर्वी तमाशाला लोकं बैलगाड्या, सायकली घेऊन, प्रसंगी पायी येत असत. मंडळी गर्दी करायची. गणगौळण, रंगबाजी, वगनाट्य पाहण्यासाठी झुंबड उडायची. वगही आध्यात्मिक, सामाजिक, पौराणिक, धार्मिक, चालू घडामोडींवर असत. त्यातून व्यसनमुक्तता, साक्षरता, स्त्री-पुरूष समानता, कौटुंबिक जिव्हाळा, राजकारणातील दुश्मनी, अंधश्रद्धा याविषयी प्रबोधनही केलं जात असल्यामुळे भटक्या व निमभटक्या जमातीच्या स्रियाही येत असत.
आजच्या सारखी हुल्लडबाजी, धांगडधिंगा नव्हता. राजीखुशीचा व्यवहार चालायचा. पूर्वी तमाशा पहाटेपर्यंत चालायचा. सध्या तमाशाला रात्रीच्या वेळेची मर्यादा आली. पहाटेपर्यंत चालणारे वग याला रात्री बारावाजेपर्यंतची मर्यादा आली. त्यामुळे वग बुडाला. ही कला लोप पावत चालली. हुल्लडबाजीमुळे त्यात बीभत्सता घुसत गेली.
गावोगावच्या जत्रा या काळानुसार बदलत चालल्या आहेत. तेव्हा त्या जत्रांचं स्वच्छ स्वरूप ज्या ज्या लोकांनी पाहिलंय ते जत्रांचं स्वच्छ स्वरूप हे पुढच्या पिढीला माहिती करवून देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावोगावच्या जत्रांचं दस्तऐवजीकरण करणे. आपण विस्तृत स्वरूपात आपल्या गावातील चालीरीतींबद्दल, लोककलांबद्दल लिहून ठेवलं पाहिजे. आपण नाही करायचं हे काम तर कुणी करायचं?
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.