
Pune News : ऊस पिकात राहून नत्र स्थिर करणाऱ्या उपयुक्त जिवाणू समूहाच्या वापरावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) उत्तम संशोधन केले आहे. या जिवाणू खताच्या वापरामुळे नत्रयुक्त रासायनिक खतांच्या मात्रांमध्ये ७५ टक्क्यांपर्यंत बचत होत असल्याचे सिद्ध झाले आहे.
‘व्हीएसआय’च्या पीक उत्पादन व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग यांच्या म्हणण्यानुसार, संयुक्त कृषी संशोधन शिफारस समितीने ‘व्हीएसआय’च्या या जिवाणू समूह (एन्डोफायट्स) वापराच्या शिफारशीला मान्यता दिलेली आहे.
या जिवाणू समूहामुळे ऊस उत्पादनात वाढ होते. याशिवाय साखर उत्पादन व गुणवत्तेतदेखील वाढ होते. यापूर्वी अॅसिटोबॅक्टर जिवाणू खताच्या वापरामुळे ५० टक्के नत्र बचत होत असल्याचे मानले जात होते. मात्र या समूहामुळे नत्र बचत आणखी २५ टक्क्यांनी वाढली आहे.
‘व्हीएसआय’च्या कृषी सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख सुधा घोडके म्हणाल्या, ‘‘या जिवाणू खताच्या वापराविषयक संशोधनाच्या चाचण्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रांसह राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या आणि ‘व्हीएसआय’च्या कार्यक्षेत्रावर घेण्यात आलेल्या आहेत.
संशोधनातील प्रयोगांमधील आलेले निष्कर्ष ५१ व्या संयुक्त कृषी संशोधन शिफारस समितीच्या बैठकीत मांडले गेले. त्यासाठी ‘व्हीएसआय’चे सल्लागार शिवाजीराव देशमुख, महासंचालक संभाजीराव कडू-पाटील, शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग, राहुरी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. तानाजी नरुटे यांनी प्रयत्न केले.’’
‘‘हरितके’ नावाने विक्रीसाठी उपलब्ध’
‘‘या जिवाणू समूहाला शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी ‘व्हीएसआय’कडून प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यासाठी ‘हरितके’ नावाने बाटलीबंद स्थितीत राज्यभर विक्रीसाठी उपलब्ध आहे. प्रतिलिटर २५३ रुपये शुल्क भरून शेतकऱ्यांना जवळच्या सहकारी साखर कारखान्यात किंवा ‘व्हीएसआय’मध्ये (०२०-२६९०२२६७) जिवाणू समूह विकत मिळू शकतो,’’ असे शास्त्रज्ञ घोडके यांनी स्पष्ट केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.