
Nashik News : गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे नुकसान करीत शेतीच्या नियोजनावर पाणी फेरले आहे. मे महिना शेती मशागतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असताना, या काळात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे काम ठप्प झाले आहे. नांगरणी, खत टाकणे, बांधबंदिस्ती यांसारखी पूर्वतयारी होण्याआधीच वातावरणाने पलटी घेतल्यामुळे खरीप हंगामाच्या पेरणीवर संकटाचे सावट घोंगावत आहे.
नाशिक जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून वादळी वाऱ्यासह कुठे रिमझिम, तर कुठे मुसळधार अवकाळी पाऊस झाल्याने मशागतीच्या कामांना ब्रेक लागला असून, शेतकऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडत आहे. ही परिस्थिती आणखी आठ-दहा दिवस कायम राहिल्यास खरीप हंगामात पेरणी कशी करावी, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
जूनमध्ये पावसाळा सुरू होतो. ७ जूनपासून मृग नक्षत्राला प्रारंभ होऊन त्यात पाऊस पडल्यास शेतकरी पहिल्याच पावसात खरीप हंगामाची पेरणी करतात. म्हणून खरीप हंगामासाठी मे महिना महत्त्वाचा असतो.
१ मे ते ५ जूनपर्यंत शेतीची नांगरणी, वखरणी, कोळपणी, अंतर्गत दुरुस्ती, शेणखत टाकणे, बांधबंदिस्ती करणे आदी कामे करण्याची वेळ असते. तसेच मेमध्ये शेतीची नांगरणी होऊन जमीन तापली तरच जून महिन्यात लागवड झालेल्या पिकांची उगवणक्षमता चांगली असते. मात्र, या मे महिन्यातील अवकाळी पावसाच्या मुक्कामाने खरीपपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत.
अवकाळीचा मुक्काम
अजून अवकाळी पाऊस ३० मेपर्यंत मुक्कामी असल्याचे सांगितले जात असल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्रात पेरणीसाठी शेती तयार होईल का, हा प्रश्न सतावत आहे. आता मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या अवकाळी पावसाने पावसाळ्यात पाऊस लांबणार तर नाही ना हाही प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.