
Animal Care : माणसांप्रमाणेच जनावरांमध्येही हर्निया हा आजार दिसून येतो. पण जनावरांतील हर्निया बऱ्याच पशुपालकांना ओळखता येत नाही. गाई, म्हशींच्या शरीरातील स्नायू जेव्हा कमजोर बनतात आणि सतत असलेल्या दबावामुळे किंवा इतर कारणामुळे हर्निया होतो.
हर्निया म्हणजे शरीरातील नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रातून एखादा अवयव, इंद्रिय किंवा त्या अवयवाचा भाग बाहेर येणे.काही वेळा जनावरे चाऱ्याच्या कमतरतेमुळे अखाद्य वस्तू खातात. अशा वस्तूंमध्ये खीळ्यांसारखी जर एखादी टोकदार वस्तू पोटाच्या रेटीकुलम भागात जाऊन पडली तर इजा होत नाही पण जर खीळा आडवा गेला तर रेटीकुलमला छेदून छातीच्या पोकळीत येतात.त्यामुळे छाती आणि पोट यांच्यामध्ये असणारा पडद्याला म्हणजेच डायफ्रॅम ला छिद्र पडते. अपचन झाल्यास पोट फुगणे, गाभणपणामुळे उदर पोकळीचा आकार वाढणे इत्यादी कारणांमुळे डायफ्रॅम ला असलेले छिद्र वाढत जाते. त्यामुळे जनावराला डायफ्रॅमॅटिक हर्निया होतो.
हर्नियाची लक्षणे काय आहेत?
जनावराला वारंवार पोटफुगी होते. ही पोटफुगी औषधोपचार केल्यानंतर कमी होते. पण औषधाचा परिणाम संपल्यानंतर परत पोट फुगते. हृदयाचे ठोके अनियमित होतात, क्षीण होतात. श्वास घेण्यास त्रास होतो. श्वास घेताना घर घर आवाज येतो. चालताना जनावरे आडखळतात. गाई, म्हशींना खोकला लागतो. हा खोकला औषधोपचार केल्यानंतरही कमी होत नाही. चारा कमी खाणे किंवा अजिबात चारा न खाणे. वजन कमी होणे. छातीच्या पोळीवर सूज येणे अशी लक्षणे दिसतात. याशिवाय जनावर पातळ शेण टाकते, कधी काळ्या रंगाचे पातळ शेण टाकते, शेणाला घाण वास येतो. वेळेवर उपचार झाले नाही तर गाई, म्हशी मलूल होतात. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण अतिशय कमी होते. आणि शेवटी जनावराचा मृत्यू होतो.
उपचार आणि काळजी
लक्षणांवरून हर्निया च निदान करता येत. या आजारावर शस्त्रक्रिया हाच उपचार आहे. ही एक अवघड शस्त्रक्रिया असते. यासाठी दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. आधी पोटाची शस्त्रक्रिया करून पोटातील न पचलेले खाद्य काढून पोट मोकळे करतात. सोबतच तार, सुई, खिळा यासारख्या लोखंडी वस्तू पोटात असतील तर काढून टाकतात. त्यानंतर छातीची शस्त्रक्रिया करतात. जंतू संसर्ग टाळण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी औषधे इंजेक्शन स्वरूपात दिली जातात. हे इंजेक्शन शस्त्रक्रिया केल्यानंतर सतत पाच ते सात दिवस द्यावे लागतात. काही दिवस सलाईन दिले जाते. शस्त्रक्रिया केलेल्या जागेवर माशी बसून आसडी म्हणजेच आळी पडू नये यांची काळजी घ्यावी लागते.
सोबतच टाके व्यवस्थित राहतील यांची खबरदारी घ्यावी लागते. शस्त्रक्रिया केल्यानंतर साधारणपणे अकरा ते बारा दिवसानंतर टाके काढून घ्यावेत. या काळात गाई, म्हशींना बद्धकोष्ठता, भूक कमी लागणे, थोडी पोटफुगी, खोकला या समस्या दिसू शकतात, परंतु योग्य औषधोपचाराने त्या दूर होतात. वेळीच निदान आणि उपचार केल्यास हा विकार बरा होऊ शकतो. हार्निया जर टाळायचा असेल तर गाई, म्हशींना अतिरिक्त ताणापासून वाचवण गरजेच असत. याशिवाय त्यांना तंतुमय पदार्थ आणि भरपूर पाणी द्याव यामुळे बद्धकोष्ठता होत नाही. वेळोवेळी जंतनाशक आणि योग्य संतुलित आहार द्यावा. जनावरांच वजन नियंत्रित राहील याकडे लक्ष द्याव. अशा प्रकारची जर काळजी घेतली तर हर्निया टाळता येतो.
----------
माहिती आणि संशोधन - पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय,परभणी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.