Village Development : आदिवासी गावांचा कायापालट होणार

PM Janjatiya Unnat Gram Abhiyan : दुर्गम, अतिदुर्गम भागांत राहणाऱ्या आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
Village Development
Village DevelopmentAgrowon
Published on
Updated on

Nanded News : दुर्गम, अतिदुर्गम भागांत राहणाऱ्या आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशातील ६३ हजार, तर महाराष्ट्रातील पाच हजार ९७६ आदिवासी गावांचा कायापालट होणार आहे. राज्यामधील ३२ जिल्ह्यांतील १२ लाख ८७ हजार ७०२ आदिवासींचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण केले जाणार आहे. या अभियानासाठी आवश्यक निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान जनजातीय उन्नत ग्राम अभियानाची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत या अभियानाला मंजुरी देण्यात आली. या अभियानाचा प्रारंभ ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. ‘पीएम-जनमन’ अभियानात १७ मंत्रालयांद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध २५ उपक्रमांचा समावेश असणार आहे.

Village Development
Village Development : जलसंवर्धन, ग्रामविकासात ‘जीआयएस’ महत्त्वाचे...

त्याद्वारे सामाजिक पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, आजीविका यामधील तफावत भरून काढण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच आदिवासी क्षेत्र आणि समुदायांच्या सर्वांगीण आणि शाश्‍वत विकासावर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान जनजातीय उन्नत ग्राम अभियानात सहभागी प्रत्येक मंत्रालयावर आगामी पाच वर्षांत निश्‍चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनुसूचित जमातींचा विकास कृती आराखडा तयार करून उपलब्ध निधीद्वारे त्यांच्याशी संबंधित योजना कालबद्ध पद्धतीने कार्यान्वित करण्याची जबाबदारी असणार आहे.

Village Development
Village Development : गावच्या सर्वांगीण विकासाचे ठेवा ध्येय्य

दरम्यान, या अभियानांतर्गत समाविष्ट असलेली आदिवासी गावे पीएम गतिशक्ती पोर्टलवर संबंधित विभागाद्वारे त्याच्या योजनेतून मॅप केल्या जातील. पोर्टलचे भौतिक आणि आर्थिक प्रगतीचे परीक्षण केले जाईल. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या उपकृमांतर्गत पक्की घरे, ग्रामीण भागात रस्ते, प्रत्येक घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, सर्व घरांमध्ये वीज जोडणी, मोबाइल मेडिकल युनिटची स्थापना, आयुष्मान कार्ड, एलपीजी कनेक्शन, आदिवासी बहुउद्देशीय विपणन केंद्र, आश्रमशाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, सिकलसेल निमियाशी लढण्यासाठी केंद्राची निर्मिती, होम स्टे आदी सुविधा मिळणार आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय आदिवासी गावांची संख्या

अहमदनगर ११८, अकोला ४३, अमरावती ३२१, छत्रपती संभाजीनगर ११, बीड २, भंडारा १४, बुलडाणा ४३, चंद्रपूर १६७, धुळे २१३, गडचिरोली ४११, गोंदिया १०४, हिंगोली ८१, जळगाव ११२, जालना २५, कोल्हापूर १, लातूर २, नागपूर ५८, नांदेड १६९, नंदुरबार ७१७, नाशिक ७६७, उस्मानाबाद ४, पालघर ६५४, परभणी ५, पुणे ९९, रायगड ११३, रत्नागिरी १, सातारा ४, सोलापूर ६१, ठाणे १४६, वर्धा ७२, वाशीम ७१, यवतमाळ ३६६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com